टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर मात केली. भारताचा डाव २० षटकात ७ बाद १५१ धावांवर आटोपल्यानंतर पाकिस्तानने १८ षटकात १० गडी राखून या धावा पूर्ण केल्या. पाकिस्तानचे सलामीचे फलंदाज बाबर आणि रिझवान यांनीच भारताची धावसंख्या गाठली. बाबरने ५२ चेंडूत ६८ धावा तर रिझवानने ५५ चेंडूत ७९ धावा केल्या. किक्रेटच्या कोणत्याही प्रकारच्या विश्वचषकात पहिल्यांदाच पाकिस्तान भारताविरुद्ध विजयी ठरला आहे. एकाही भारतीय गोलंदाजाला पाकिस्तानची ही सलामीची जोडी फोडता आली नाही. या विजयामुळे पाकिस्तानमध्ये एकच जल्लोष झाला.
भारताकडून सलामीला आलेल्या रोहित शर्माला खातेही उघडू दिलं नाही तर के एल राहुल ३ धावा केल्यावर बाद झाला. यानंतर आलेला सूर्यकुमार यादव ११ धावांवर बाद झाला. यष्टीरक्षक रिझवानने झेलबाद केले. भारताचा ६ व्या षटकामध्ये ३ बाद ३६ धावांचा स्कोर होता. ९ व्या षटकामध्ये भारताचे अर्धशतक पूर्ण झाले. पंत २ चौकार आणि २ षटकार टोलवत ३९ धावांवर बाद झाला. विराटच्या सोबतीसाठी रवींद्र जडेजा मैदानात उतरला. १५ व्या षटकात भारताने आपलं शतक पूर्ण करुन ४ बाद १०० धावा केल्या.
विराट कोहलीने १८ व्या षटकामध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले यानंतर जडेजा १३ धावा केल्यावर झेलबाद झाला. हार्दिक पांड्या आता मैदानात उतरला मात्र १९ व्या षटकामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला आफ्रिदीने बाद करत तंबूत पाठवले. विराटने ५७ धावा केल्या यामध्ये ५ चौकार आणि एक षटकार मारला. ११ धावांवर हार्दिक पांड्या झेलबाद झाला. भुवनेश्वर कुमार ५ धावांसह नाबाद तर मोहम्मद शमी शून्यावर नाबाद राहिला आहे.
हेही वाचा : T20 WC ind vs pak : भारताचे पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान, विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण