टी२० विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना फारच रोमांचकारी ठरत आहे. पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर भारताकडून रोहित शर्मा आणि के. एल राहुल सलामीला उतरले. मात्र दोन्ही सलामीवीरांना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या तीन षटकांमध्ये माघारी पाठवले. रोहित शर्मा आपलं खातंही खोलू शकला नाही तर के एल राहुल ३ धावा करुन बाद झाला. के एल राहुलनंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि के एल राहूल या दोघांना बाद केले.
टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारताची सुरुवात निराशाजनक ठरली आहे. सलामीवीरांच्या विकेटनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकाकी झुंज देत संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहचवण्यासाठी मदत केली आहे. विराट कोहली अर्धशतक ठोकून ५७ धावांवर बाद झाला. भारतीय संघाकडून पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
भारताकडून सलामीला आलेल्या रोहित शर्माला खातेही उघडू दिलं नाही तर के एल राहुल ३ धावा केल्यावर बाद झाला. यानंतर आलेला सूर्यकुमार यादव ११ धावांवर बाद झाला. यष्टीरक्षक रिझवानने झेलबाद केले. भारताचा ६ व्या षटकामध्ये ३ बाद ३६ धावांचा स्कोर होता. ९ व्या षटकामध्ये भारताचे अर्धशतक पूर्ण झाले. पंत २ चौकार आणि २ षटकार टोलवत ३९ धावांवर बाद झाला. विराटच्या सोबतीसाठी रवींद्र जडेजा मैदानात उतरला. १५ व्या षटकात भारताने आपलं शतक पूर्ण करुन ४ बाद १०० धावा केल्या. विराट कोहलीने १८ व्या षटकामध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले यानंतर जडेजा १३ धावा केल्यावर झेलबाद झाला. हार्दिक पांड्या आता मैदानात उतरला मात्र १९ व्या षटकामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला आफ्रिदीने बाद करत तंबूत पाठवले. विराटने ५७ धावा केल्या यामध्ये ५ चौकार आणि एक षटकार मारला. ११ धावांवर हार्दिक पांड्या झेलबाद झाला. भुवनेश्वर कुमार ५ धावांसह नाबाद तर मोहम्मद शमी शून्यावर नाबाद राहिला आहे.
हेही वाचा : T20 World Cup: चारिथा- राजपक्षाची सर्वोत्कृष्ट खेळी, श्रीलंकेचा ५ विकेट्सनं विजय