अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कुसुमाग्रजनगरीत अभिजात मराठी भाषेच्या दालनामध्ये प्रामुख्याने मराठीच्या इतिहासाची मांडणी करणारी उदाहरणे, मराठीचे भाषिक आणि कालिक भेद दर्शविणारा आढावा घेतला जाणार आहे. अधिकृत शिलालेखांच्या प्रतिकृती, मराठीच्या मध्ययुगीन वैभवाची मांडणी, बहामनी काल, शिवकालीन, पेशवेकालीन, १९ व्या शतकातील मराठी, आधुनिक मराठी, मराठी साहित्य परंपरेचे दालन अशा दोन हजारी वर्षापूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासा दरम्यानची माहितीदेणार्या विविध सबळ पुराव्यांचे आणि संबंधित शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाषेचे टप्पे, दुर्मिळ ग्रंथ. निवडक गाथा आदीच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन या दालनात असणार आहे.मराठीतील प्राचिन व दुर्मिळ ग्रंथ, साहित्य आदी सामुग्री टचस्क्रिनवर मराठी प्रेमींना पाहावयास मिळणार आहे. याशिवाय शासनाने प्रकाशित केलेल्या विविध पुस्तकांच्या पेनड्राईव्ह मधील विश्वकोष विक्रीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
संमेलनाच्या निमित्ताने लघुपटाची निर्मिती
संमेलनाच्या निमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेने ‘शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. यामध्ये एक अभिरुप न्यायालय अशी संकल्पना करण्यात आली असून यात वादविवाद आणि संवादांच्या माध्यमातून जनतेपर्यंत मराठी भाषा विभागाचे म्हणणे मांडण्यात येणार आहे. या लघुपटाची पटकथा प्रा. हरि नरके यांनी लिहिली आहे. अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या लघुपटाची निर्मिती श्रीरंग गोडबोले यांनी केली आहे, अशी माहितीही यावेळी मराठी भाषा मंत्री देसाई यांनी दिली आहे.