विजयादशमीच्या दिवशी अमृतसर मधील जोडा फाटक येथे दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघातात ५९ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर आता मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश बाहेर पडत आहे. मृतांचे नातेवाईंकानी सरकारच्या विरोधात जोडा फाटक येथे आंदोलन करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलकांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत आंदोलकांसहीत काही पोलीसही जखमी झाले आहेत. आंदोलकांना रेल्वे ट्रॅकपासून तात्पुरते बाजुला केले गेले आहे. मात्र दुसऱ्या बाजुला त्यांच्याकडून सरकार तसेच नवजोत सिंह सिद्धूच्या विरोधात घोषणाबाजी सुरु आहे. कालपासूनच स्थानिक नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पंजाब सरकारने कमांडो, रॅपिड अॅक्शन फोर्सला जोडा फाटक येथे तैनात केले होते.
हे वाचलंत का – अमृतसर येथे ‘रावणा’ने वाचवले आठ जणांचे प्राण
Amritsar:1 security personnel injured after protesters pelted stones on police when being asked to clear railway tracks where they were protesting against #AmritsarTrainAccident. Head Constable Amritpal Singh says 'They're pelting stones.He received injuries in his eyes.' #Punjab pic.twitter.com/AfdITOEJqQ
— ANI (@ANI) October 21, 2018
आंदोलकांच्या या मागण्या आहेत
धावत्या ट्रेनखाली येऊन ५९ नागरिकांचा मृत्यू झाला होता. यापैकी ४० लोकांची ओळख पटलेली आहे. तसेच काही जण अजूनही बेपत्ता असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या बेपत्ता असलेल्यांचा शोध घ्यावा आणि मृतांच्या नातेवाईकांना समाधानकारक भरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून होत आहे. याठिकाणी आंदोलन करत असलेल्या कमल यांनी सांगितले की, माझ्या परिसरात राहणारे दोन मजूर त्यादिवसापासून बेपत्ता आहेत. ते दोघेही रावण दहनाचा कार्यक्रम पाहायला गेले होते. “सरकारने जी मृतांची आकडेवारी दिली आहे, त्यापेक्षा अधिक लोक मृत झाले असावेत.”, अशी शंकाही कमल यांनी व्यक्त केली आहे.
#WATCH Amritsar: Protesters being chased away by police at Joda Phatak after they pelted stones on them when they (police) asked them to clear the railway tracks where they were sitting in protest against #AmritsarTrainAccident. #Punjab pic.twitter.com/tAPkOB5fc2
— ANI (@ANI) October 21, 2018
शनिवारी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली होती. यावेळी त्यांनी ५९ लोक मृत असून ५७ लोक जखमी असल्याचे सांगितले होते. मात्र स्थानिक पोलीस अधिकारी राजेश शर्मा यांनी मृतांचा आकडा ६१ असल्याचे सांगितले. दोघांच्याही आकडेवारीत तफावत असल्याने नागरिकांमध्ये आणखी असंतोष पसरला आहे.
राजू नामक स्थानिक रहिवाश्याने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्ती अजूनही त्याच्या वडिलांचे पार्थिव शोधत आहे. त्यांचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांना झाकण्यासाठी कापड आणायला तो गेला. मात्र परतल्यानंतर त्याच्या वडिलांचे पार्थिव त्याला होत्या त्या जागी मिळाले नाही. तेव्हापासून तो अजूनही पार्थिव शोधत आहे.