बडोद्याचा रणजीपटू विष्णू सोलंकीने खेळाडूंसमोर एक आदर्श ठेवला आहे. या खेळाडूने आपल्या मुलीच्या मृत्यूच्या दु:खात रणजी सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. तीन दिवसांपूर्वीच मुलीवर अंत्यसंस्कार करून तो मैदानात परतला होता. क्रिकेटपटूंपासून ते सर्वसामान्य लोक त्याच्या धाडसाला सलाम करत आहेत.
काही दिवसांपूर्वी विष्णूच्या नवजात मुलीने या जगातून अखेरचा श्वास घेतला. ही घटना जेव्हा त्याच्या घरी घडली. तेव्हा तो भुवनेश्वरमध्ये होता. विष्णूला ही घटना कळताच तो ताबडतोब बडोद्याला रवाना झाला. त्यानंतर त्याने आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार केले. आपल्या मुलीच्या जाण्याच्या दु:खात त्याने पुन्हा रणजी ट्रॉफीमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आणि तो भुवनेश्वरला परतला.
बडोद्यासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या विष्णूने मैदानात परतताच चंदीगडविरुद्ध तुफान खेळी केली. यावेळी त्याने १६५ चेंडूत १०४ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे बडोद्याने पहिल्या डावात ५१७ धावा करत ३४९ धावांची मोठी आघाडी घेतली. बडोदा क्रिकेट असोसिएशनने त्याच्या खेळीचे कौतुक केले आहे. तसेच त्याला हिरो देखील म्हटले आहे.
A story of a Cricketer who lost his new born daughter a few days ago.He attends the funeral and gets back to represent his team @BCCIdomestic @cricbaroda to get a hundred.His name may not make social media “likes”,but for me #vishnoosolanki is a real life hero. An inspiration!
— shishir hattangadi (@shishhattangadi) February 25, 2022
बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सीईओ शीशिर हट्टनगडी यांनी ट्विट करत लिहिले की, ही एका क्रिकेटरची गोष्ट आहे, ज्याने काही दिवसांपूर्वी आपल्या नवजात मुलीला गमावलं. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि तिच्या दुख:त सहभागी होऊन तो पुन्हा रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरला. सोशल मीडियावर जरी त्याला लाईक्स मिळाले नाहीत. तरी सुद्धा तो माझ्यासाठी खरा हिरो आहे. दरम्यान, विष्णू सोलंकीच्या या खेळाला त्याच्या चाहत्यांनी आणि रणजीपटूंनी सलाम केला आहे.
हेही वाचा : Haryana: हरियाणातील अंबालाच्या जंगलात सापडले तोफांचे गोळे, परिसरात उडाली एकच खळबळ