ICMR-NARI scientist : भारताची ट्युबरक्युलॉसिस (TB) आजारावरील पहिली लस ही येत्या २०२४ मध्ये येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच देशातील टीबी संक्रमणाचा धोका कमी होण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. महत्वाचे म्हणजे भारताला सर्वोत्तम अशी लस मिळण्याची अपेक्षा केली जात असून ही लस अतिशय परिणामकारक असेल असाही वैज्ञानिकांचा दावा आहे. देशातील टीबी आजारामुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी ही लस उपयुक्त ठरेल असेही मत भारतातील वैज्ञानिकांनी मांडले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.
नॅशनल एड्स रिसर्च इंस्टिट्यूट (NARI) पुणे येथील वैज्ञानिक डॉ सुचित कांबळे यांच्या मते देशाला अतिशय प्रभावी अशी लस मिळणार आहे. त्यामुळे देशातील टीबी आजारामुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी होण्यासाठी मदत होईल. या लसीच्या चाचणीच्या निमित्ताने देशात १८ ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात दोन ठिकाणी संशोधन होत आहे. सध्या पुण्यातील १५९३ व्यक्तींवर ही चाचणी करण्यात येत आहे. एकुण ३८ महिने या लसीच्या निमित्ताने या व्यक्तींचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. या चाचणीत लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यात येणार आहे. देशातील सहा राज्यांमध्ये तसेच १८ ठिकाणी या लसीची चाचणी करण्यात येत आहे. चाचणी करण्यात येत असलेल्या दोन लशींची नावे ही Immuvac, VPM1002 अशी आहेत.
या चाचणीच्या निमित्ताने होणारे प्रयोग हे २०२४ रोजी करण्यात येणार आहे. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हा संपूर्ण डेटा एकत्रित करण्यात येणार आहे. त्यानंतरच चाचणीचा निकाल आणि अंतिम अहवाल तयार करण्यात येईल असे डॉ सुचित कांबळे यांनी स्पष्ट केले.