कऱ्हाड – येत्या काळात प्रादेशिक पक्ष संपतील असा दावा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटले होते. आता परत एकदा एका भाजपा नेत्याची जीभ घसरली असून प्रादेशिक पक्ष दीर्घ काळ टीकतील असं वाटत नाही, असं वक्तव्य वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केलंय. तसंच, त्यांनी काँग्रेसवरही टीका केलीय. विरोधक तगडा हवा हे खरं असलं तरी काँग्रेस मात्र अंतर्गत बंडाळीमुळे संपण्याचा मार्गावर आहे, असं सोमप्रकाश म्हणाले. सातारा लोकसभा मतदारसंघात ते भाजपाच्या संपर्क मोहीम कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले, सरचिटणीस विक्रम पावसकर उपस्थित होते.
“भाजपा पक्ष ताकदवान पक्ष आहे. अन्य पक्ष कमजोर होत आहेत. त्यात प्रादेशिक पक्षांची संख्या जास्त आहे. काँग्रेस अंतर्गत बंडाळीमुळे संपण्याच्या मार्गावर आहे. भक्कम विरोधक हवा, मात्र ती जागा काँग्रेस दुर्दैवाने घेऊ शकत नाही,” असं सोम प्रकाश काँग्रेसविषयी म्हणाले.
“२०२४ची निवडणूक निर्णायक ठरणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. परंतु भाजपा इथं प्रयत्न करत आहे. आम्ही या मतदारसंघावर दावा करत नाही. पण पक्ष भक्कम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पक्ष भक्कम होणं गरजेचं आहे. निवडणुका लागतील, युती होईल, त्यावेळची गोष्ट वेगळी आहे. ते निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेतील,” असं प्रकाश म्हणाले.
हेही वाचा – शिवसेनेबरोबरच देशातील सर्व प्रादेशिक पक्षही संपतील, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डांचा दावा
जे.पी.नड्डा काय म्हणाले होते?
देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व प्रादेशिक पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे केला. कोणताही पक्ष भाजपला मात देऊ शकत नाही, असं जेपी नड्डा म्हणाले होते.