वाशीम : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा आज 70 वा दिवस आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने आत्तापर्यंत 1500 किलोमीटरहून अधिक अंतर कापले. या यात्रेचा महाराष्ट्रातील आज 10 वा दिवस आहे. महाराष्ट्रात या यात्रेला तुफान प्रतिसाद मिळतोय. शिवसेना, राष्ट्रवादीसह अनेक राजकीय पक्षांनी या यात्रेला पाठींबा दिला.
विशेष गोष्ट म्हणजे भारत जोडो यात्रा ज्या भागातून जाते त्या भागातील लोक पारंपरिक वेशभूषेत राहुल गांधी यांचे स्वागत करत आहेत. अस्सल संस्कृती दाखवून लोक त्यांचे मनापासून स्वागत करतात. या यात्रेत दररोज मोठ्या संख्येने लोक सामील होत आहेत. यात ‘भारत जोडो यात्रा’ का आणि कोणासाठी काढली ? ते कधी छापील पत्रकाद्वारे, तर कधी वांमनदादा कर्डक यांच्या गीतांतून, कधी संवाद साधून तर कधी छत्रपतींचा पोवाडा गाऊन…. रस्त्यांवरील उतरलेल्या जनतेमध्ये ही यात्रा रुजवण्याचे काम पुण्याची “लोकायत” संस्था करत आहे. त्यांच्या प्रबोधनाने जनतेला बोलते केले आहे.
अठरा ते चाळीस वयोगटातील तीस तरुणांचा हा ग्रूप आहे. कोणी शिक्षणात तर कोणी नोकरीत व्यस्त आहे. नोकरदार तरुण वर्गणी काढून समाजात जनजागृतीचे काम करतात. नव्या पिढीला सामाजिक मूल्यांचे प्रशिक्षण देतात. आम्ही जे काम करतो, त्याच उद्देशाने राहुल गांधी पदयात्रा काढत आहेत. म्हणूनच आम्ही यात्रेत सहभागी झालो असल्याचे त्यांनी सांगितले.
“सध्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी समाजात फूट पाडली जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई, बेरोजगारी वाढत आहे हे लोकांना पटवून देतो. देगलूर ते वाशीम पर्यंत रोज सुमारे 8 हजारप्रमाणे आतापर्यंत 1 लाख पत्रके वाटली. नांदेडच्या सभेत 18 हजार पत्रके दिली,” अशी माहिती रुषल हिना यांनी दिली.
” माझ्या शिवरायांच्या छताखाली कधीच नव्हते वाण,
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान….”
अशी गाणी सादर करून शिवरायांनी रयतेच्या हितासाठी केलेल्या आज्ञा, सर्वधर्मीय समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी त्यांची धोरणे, त्यांचा इतिहास, याची माहिती आम्ही देतो. त्यातून ते बोलते होतात. आक्रोश, आपल्या व्यथा मांडतात. स्वतंत्र्यपूर्व काळात देशासाठी काँग्रेसने दिलेले योगदान सांगतात. तेव्हा त्यांना ही यात्रा समजली असे आम्ही मानतो आणि पुढे जातो,” असेही रुषल यांनी सांगितले.