मुंब्र्यात आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा नेमका कुणाच्या संगनमताने नोंद झाला. याबाबत आव्हाडांनी एक महत्वाचं ट्विट केलं आहे. विवियाना मॉलमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत मनसे नेत्याने जसे स्पष्ट केले, तशीच स्थितीत 354 च्या गुन्ह्याची आहे, या कोणत्याही कटात मनसे नेत्याचा सहभाग नव्हता, असं ट्विट आव्हाड यांनी केला आहे. तसेच ताईला सगळं माहिती आहे, असंही ते म्हणाले.
विवियाना मॉलमध्ये झालेल्या गदारोळा नंतर माझ्यावर 354 चा कट रचण्यात आला होता. पण तो फसला. त्यात मनसेच्या कुठल्याही नेत्याचा सहभाग नव्हता. ज्यांनी मुंबऱ्याचा कट रचायला लावला तेच रचत होते… विवियानाच्या तक्रारदरावर दबाव टाकून कट रचला. ह्यात इतर कुठल्याही पक्षाचा संबंध नाही… अस ट्विट आव्हाडांनी केलं आहे. मात्र ट्विटमधून आव्हाडांना नेमका आरोप कोणावर करायचा आहे यावर चर्चा सुरु आहे.
आव्हाडांनी पुढे ट्विट करत म्हटले की, तक्रारदरानी स्वतः कबूल केले की जितेंद्र आव्हाडनी मला बाहेर काढले तर मग माझे नाव गुन्ह्यात आले कसे .. मनसे च्या ठाण्याच्या नेता जर पोलिस स्टेशन ला होता तर हे त्यानी थांबवायला हवे होते .. पण ३५४ च्या कटात तो नव्हता हे सत्य आहे .. ताईला सगळे माहीत आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटमधील ताई म्हणजे भाजपच्या पदाधिकारी रीदा राशिद या आहेत. ज्यांनी मुंब्रा येथील घटनेत जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर आव्हाडांविरोधात 354 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रीदा राशिद यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केल्यानंतर आव्हाडांचा संताप अनावर झाला होता. यावेळी त्यांनी बाकी कोणताही गुन्हा चालेल पण 354 चा गुन्हा नको म्हणत राजकारणातून संन्यास घेण्याची भावना व्यक्त केली. तसेच हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल करण्यात आल्याचा आरोप केला.
यावेळी आव्हाडांविरोधात दाखल झालेला गुन्हा मनसेचे षडयंत्र असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. मात्र आव्हाडांनी आता ट्विट करत यात मनसेचा कोणताही हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आव्हांडाचा नेमका रोख भाजपवर तर नाही ना अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र आव्हाडांच्या ट्विटचा खरा रोख नेमका कोणाकडे आहे? कटात सहभागी असणारे कोण आहेत? यावर उलट सुलट चर्चा सुरु आहेत.