नाजिम खतिब, मनोर: पालघर जिल्ह्यात दहा लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे.वृक्ष लागवडीसाठी राज्याचा रोजगार हमी योजना विभाग आणि टाटा मोटर्समध्ये रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.मंत्री संदीपान भुमरे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिन नंदकुमार, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपसचिव संजना खोपडे, सहायक संचालक विजयकुमार कलवले, पालघर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी समीर वाठारकर, टाटा मोटर्सचे विनोद कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी सोनपाल, बायफ प्रकल्पाचे सुधीर वागळे उपस्थित होते.
कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीचा वापर शासनाच्या योजना राबवण्यासाठी करण्याचे आवाहन राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे.टाटा मोटर्सच्या सीएसआर निधीतून पालघर जिल्ह्यातील पाच हजार आदिवासी लाभार्थींना प्रत्येकी 200 रोपांचे वाटप केले जाणार आहे.10 लाख वृक्ष लागवड रोजगार हमी योजने अंतर्गत करण्याकरिता सामंजस्य करार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. टाटा मोटर्स कंपनीकडून सीएसआर मधून समाज उपयोगी कामे आणि पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड केली जाते.काजू, चिकू, सीताफळ, कढीपत्ता, बांबू सारखी फळझाडांची कलमे, रोपे आणि खते उपलब्ध करून दिली जातात. यावर्षी सुमारे दहा लाख कलमे टाटा मोटर्स कडून उपलब्ध करून दिली जाणार आहेत.एका झाडाची किंमत 40 रुपये असल्याने दहा लाख झाडांच्या रोपांची रक्कम सुमारे चार कोटी रुपये इतकी होणार आहे.वृक्षलागवडीनंतर खते उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकर्यांच्या शेतजमिनीचे बांध आणि शेतकर्याच्या पडीक जमिनीवर वृक्षारोपण होणार आहे.एका शेतकर्याला 200 झाडे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये आंबा, काजू, सीताफळ, चिकू अशी मिश्र झाडे लावण्यात येणार असल्याचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी सांगितले.