मुंबई – नागपूर सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस -वे अर्थात समृद्धी महामार्गाचे काम नववर्षात सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यात सिन्नर आणि इगतपुरी या दोन तालुक्यातून जाणार्या महामार्गालगतच्या गावात शेतकर्यांना मोफत शेततळी तयार करून देण्यात येणार आहेत. यामुळे महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजही सहज उपलब्ध होईल आणि दुष्काळी भागातील शेतकर्यांना दिलासा मिळेल, असा यामागचा उददेश असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या संकल्पनेतून हा विषय पुढे आला. मुख्यमंत्र्यांचा स्वप्नवत प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. नाशिक जिल्ह्यातून जाणार्या १०० किलोमीटरच्या या मार्गासाठी २० हजार ४८९ शेतकर्यांची २१ हजार हेक्टर जमीन वाटाघाटीने घेतली जात असून, त्यात ९० टक्के जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या प्रकल्पासाठी ८८ टक्के जमीन संपादीत झाली आहे. त्यामुळे लवकरच महामार्गाचे भुमिपूजन होऊन कामाला सुरुवात होणार आहे. या महामार्गालगत अनेक शेतजमिनी असून काही गावांमध्ये शेतकर्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या शेतकर्यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास ठेकेदारामार्फत त्यांना शेततळे तयार करून देण्यात येणार आहे. यातून मिळणारे गौण खनिज महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे.
दुहेरी फायदा
महामार्ग उभारण्यासाठी लागणारे गौण खनिज मुरूम, दगड, माती सहज उपलब्ध व्हावी तसेच शेतकर्यांनाही याचा फायदा मिळावा, यासाठी ठेकेदार शेतकर्यांना मोफत शेततळी तयार करून देणार आहे. यातून मिळणारे गौण खनिज महामार्गाच्या कामासाठी वापरणार आहे. समृद्धी महामार्ग ज्या भागातून जाणार आहे, त्या बाजूला असणार्या शेतकर्यांना पाहिजे त्या प्रमाणात कंत्राटदार शेततळे तयार करून देईल, आणि यातून मिळणारे मुरूम, दगड, माती तो महामार्गाच्या कामासाठी वापरणार आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतकर्यांना मोठा फायदा होणार असून कंत्राटदाराला सहज गौण खनिज उपलब्ध होणार आहे.