पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये लोकांच्या बॅंक खात्यामध्ये अचानकपणे हजारो रुपये जमा व्हायला लगाले आहेत. त्यामुळे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १५ लाख रुपयांचे आश्वासन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांनी विदेशातील काळा पैसा देशात आणून लोकांमध्ये वाटणार, अशी घोषणा केली होती. त्यांच्या याच घोषणेची पूर्तता होत आहे की काय? असा प्रश्न लोकांना पडला आहे. दरम्यान, हे पैसे काढण्यासाठी लोकांची एटीएमबाहेर रांगा लागल्या आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
पश्चिम बंगालच्या बर्धमान जिल्ह्यातील शिबलून, बेलून, टोलाबाडी, सेनपाडा, अंबालग्राम, नवग्राम आणि आंबालटुकरी या गावांमध्ये वास्तव्यास असलेल्या काही लोकांच्या बँक खात्यामध्ये अचानक २ हजार पासून ते २४ हजार रुपयांपर्यंत पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे बँक आणि एटीएमबाहेर लोकांची मोठी रांग लागली आहे. परंतु, हे पैसे फक्त यूको बँक, यूनायटेड बँक ऑफ इंडिया आणि एसबीआय बँकेच्या खातेदारांच्या अकाउंटमध्ये आले आहेत.
भाजप आमदार म्हणतात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये येतील, घोषणा केली होती. या आश्वासनाच्या आमिषाला बळी पडून अनेक लोकांनी नरेंद्र मोदींना मतदान केले. याच आश्वासनामुळे देशात मोदी लाट आली. या आश्वासनामुळे लोकांना माहीत नसलेले उमेदवार देखील निवडून आले. या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक असा विजय मिळवत लोकसभेच्या २८२ जागांचा ताबा घेतला. परंतु, गेल्या साडे चार वर्षांपासून कुणाच्याही अकाउंटमध्ये रुपयाही आला नाही. परंतु, सध्या पश्चिम बंगालमध्ये काही लोकांच्या बँक खात्यामध्ये हजारो रुपये आले आहेत. यावर भाजप आमदार शाहनवाज हुसैन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, मोदी सरकारने १५ लाख रुपयांची घोषणा केली होती. त्यामुळे आता लोकसभा निवडणूक अगोदर मोदी सरकारने बॅंक अकाउंटमध्ये पैसे टाकले असावेत.
कुठून आला नेमका पैसा?
हा पैसा नेमका कुठून आला? याबाबत लोकांना माहिती नाही. परंतु, या विषयी एका बँक अधिकाऱ्याला विचारले असता, त्यांनी सांगितले की, हे पैसे अॅक्सिस बॅंकेतून एनईएफटीद्वारे आले आहेत. त्याचबरोबर जोपर्यंत पुर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत यावर प्रतिक्रिया देणे अवघड आहे, असेही ते म्हणाले आहेत.