कल्याणातील खडकपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या मोहने पोलीस चौकीतील कर्तव्यावर असणाऱ्या निम्म्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. काही पोलीस स्वतःहून होम क्वारंटाईन झाले असून मोहने चौकीत सध्या कर्तव्यावर असणारे अन्य पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मोहने परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. साधारण चार दिवसापूर्वी मनसे नगरसेविका सुनंदा कोट यांच्या प्रयत्नाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार करीत अँटीजन टेस्ट चाचणी केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी याबाबत दखल घेत मोहने येथील नागरिकांकरिता मोफत कोरोना टेस्ट चाचणी केंद्र सुरू केले आहे.
कोरोनाला अटकाव घालण्यासाठी पोलीस प्रशासन येथे मोठ्या हिमतीने काम करीत असताना १६ पोलीस कर्मचाऱ्यांपैकी नऊ पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चौकीतील या पोलिसांवर विविध कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून अन्य पोलीस होम क्वारंटाईन झाल्याची माहिती मिळत आहे.
खडकपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असणाऱ्या मोहने पोलीस चौकीत दोन पोलीस अधिकारी आणि अन्य १४ कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस चौकीत घरगुती भांडणे, स्थानिक लेव्हल वर निपटारा करायचे काम, पोलिस करत असून यामुळे ही चौकी नेहमीच गजबजलेली दिसून येत असते. अटाळीतील अंधश्रद्धेतून दोन बळी घेतले होते त्यातही दोन आरोपी पॉझिटिव्ह निघाल्याची चर्चा आहे.
धारावीत आज १२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून धारावीतील एकूण बाधितांचा आकडा २ हजार ५८५वर पोहोचला आहे. तसेच दादरमध्ये आज ४१ नवे रुग्ण आणि माहिममध्ये २९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ८७०वर तर माहिममधील १ हजार ७६१वर पोहोचला आहे.
कोरोनाच्या काळात जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुन्हा आता राज्याकडून जिमला परवानगी दिली जात आहे.
पुणेकरांची चिंता कायम!
पुणेकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पुणे शहर जिल्ह्यात रविवारी दिवसभरात तब्बल ३ हजार १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येने आतापर्यंत ९० हजारांचा आकडा ओलांडला आहे. तर पुण्यात ६३९ रुग्ण गंभीर असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. तर २ हजार २०२ रुग्ण ऑक्सिजनवर असल्याने धोका अद्याप टळलेला नाही. १ हजार २०३ रुग्ण मात्र, बरे होऊन घरी परतल्याने दिलासा मिळाला आहे. (सविस्तर वाचा)
औरंगाबादमध्ये ८७ करोना बाधितांची वाढ
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, सोमवारी सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात ८७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ६४० इतकी झाली आहे. त्यापैकी १० हजार ९०१ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात ४८४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर सध्या ३ हजार २५५ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. (सविस्तर वाचा)
सांगलीच्या कारागृहात करोनाचा शिरकाव. ६३ कैद्यांना करोना. तीन महिलांचाही समावेश
अहमदनगर: नगरमध्ये दिवसभरात वाढले ४०३ करोना रुग्ण, एकूण रुग्णसंख्या झाली ५ हजार ९११
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाल्याचे बघायला मिळाले आहे. गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ५२ हजाराहून अधिक नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यासह, ७७१ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशात आज संक्रमित झालेल्यांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे, तर ३८ हजारांहून अधिकांचा मृत्यूही झाला आहे.
Single-day spike of 52,972 positive cases & 771 deaths in India in the last 24 hours.
India’s COVID19 tally rises to 18,03,696 including 5,79,357active cases, 1,186,203 cured/discharged/migrated & 38,135 deaths: Health Ministry pic.twitter.com/OKfjsgwyC9
— ANI (@ANI) August 3, 2020
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. येडियुरप्पा यांनीच ट्विटरवरुन यासंदर्भात खुलासा केला आहे. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे, अशी माहिती येडियुरप्पा यांनी ट्विटवरुन दिली आहे. येडियुरप्पा हे कोरोनाचा संसर्ग झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी २५ जुलै रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विट करून मला करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती दिली होती. (सविस्तर वाचा)
राज्यात २४ तासात ९,५०९ नवे रूग्ण, तर २६० मृत्यू!
राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ५०९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २६० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ४१ हजार २२८ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १५ हजार ५७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण १ लाख ४८ हजार ५३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२.७४ टक्के एवढे झाले आहे.