मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तपदी जयश्री एस. भोज यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. जयश्री एस. भोज यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. यावेळी सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत केले. तसेच अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्याजागी भोज यांची नियुक्ती झाली असून तुर्तास तरी सिंघल यांच्याकडील कामांचा भार त्यांच्याकडे सोपवला जाईल. यामध्ये रस्त्यांसह महत्वाच्या खात्यांचा भार अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांच्याकडे जाणार असल्याने भोज यांच्याकडे मोजक्याच काही खात्यांसह विभागांचा भार सोपवला जाण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी भोज या ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होत्या. भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००३ मधील तुकडीच्या त्या अधिकारी आहेत. राज्यशास्त्र या विषयामध्ये बी. ए. (ऑनर्स) आणि लोक प्रशासन या विषयामध्ये (एम. ए.) पदव्युत्तर पदवी संपादीत केल्यानंतर २००३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. प्रारंभी २००४ ते २०१२ दरम्यान जयश्री एस. भोज यांनी नागपूर जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यात उप विभागीय अधिकारी, नागपूर जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी, भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कामकाज सांभाळले.
तसेच आंतरराज्य प्रतिनियुक्तीवर असताना २०१२ ते २०१७ या कालावधीत त्या कानपूर (उत्तर प्रदेश) विकास प्राधिकरणच्या उपाध्यक्ष आणि उत्तर प्रदेश लघु उद्योग निगमच्या निर्देशकही होत्या. जून २०१७ पासून त्या ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होत्या.
जयश्री भोज तुमचे अभिनंदन. बोरीवली पश्चिम आर सी वाॅर्ड योगीनगर वसाहतीत मेनरोड आणि आतिल रस्त्यावर फेरीवाले फळे भाज्या आणि भर रस्त्यावर खाद्यपदार्थ बनवुन विकतात. ह्याकरता सर्व प्रकारचे वाहनधारक वाटेल तसे वाहन पार्क करतात. तसेच हे विक्रीकरणारे सुध्दा वाटेल तशी त्यांची वाहने लावतात. याचा पादचारी आणि रहदारीवर विपरीत परीणाम होतो. यावर त्वरीत भक्कम कारवाई करावी. वारंवार कळवुनसुध्दा ठोस उपाय व परीणाम नाही