घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री असताना फडणवीसांनी कुणाकुणाला धमकावले हे सारा महाराष्ट्र जाणतो

मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी कुणाकुणाला धमकावले हे सारा महाराष्ट्र जाणतो

Subscribe

संजय राऊत यांचा पलटवार

मुख्यमंत्र्यांच्या सामनातील मुलाखतीतील सौम्य भाषाही धमकी वाटत असेल तर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही सत्तेवर असताना कोणाकोणाला धमकावलेत ते सारा महाराष्ट्र जाणतो. कसे धमकावले जात होते हे सांगायला भाग पाडू नका, असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. न्यायालयाच्या एका निकालावर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची प्रथा पडणार असेल तर त्यांनी तशी मागणी करुन नवीन पायंडा पाडावा, असा टोलाही संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील मुंबई महापालिकेची कारवाई बेकायदा ठरवल्यावर भाजप नेत्यांकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी होऊ लागली आहे. हा धागा पकडून राऊत यांनी भाजप नेत्यांवर प्रखर टीका केली. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेवर तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांना जामीन न देणे ही चूक असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या दोन निकालावरुन देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधत पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारने सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला असल्याचा आरोपही केला.

- Advertisement -

फडणवीसांच्या या आरोपांवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना बेकायदा बांधकाम पाडलं हा विषय राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा होतो का, अशी विचारणा केली. मराठी उद्योजकाच्या आत्महत्येस दोषी असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली म्हणून राष्ट्रपती राजवट लावावी असं कोण म्हणत असेल त्यांना कायदा वाचण्याची गरज आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. सामनाच्या मुलाखतीकडे बोट दाखवत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषेवर आक्षेप नोंदवला. हे निदर्शनात आणून देताना तुम्ही मुख्यमंत्री असताना कोणाकोणाला धमकावलेत ते सांगायला लावू नका, असे राऊत यांनी बजावले. कंगना आणि अर्णब प्रकरणांमध्ये सत्तेचा व यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा भाजप नेत्यांचा आरोप राऊत यांनी फेटाळून लावला.

सत्तेचा गैरवापर कोण करतेय, हे सगळ्यांनाच माहिती आहे, असे राऊत म्हणाले. सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी कुठेही धमकीची भाषा वापरलेली नाही. पण फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत असेल तर फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारविरोधात बोलणार्‍यांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे, असे विधान त्यांनी कोणाच्या प्रेमापोटी केले होते, असे राऊत यांनी विचारले. फडणवीसांची ही भाषा भयंकर धमकीची होती. म्हणजे सत्तेचा वापर करुन तुम्ही धमकी देऊ पाहत होतात का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -