कोरोनाच्या सावटामुळे प्रत्येक छोट्या मोठ्या व्यवसायाला फटका बसला आहे.याशिवाय सततच्या होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांना महागाईचा सामाना करावा लागत आहे. त्यातच आता सर्व सामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे वडापावही महागला आहे. वडापावसाठी लागणाऱ्या तेल,बेसन आणि सिलिंडर यांच्या वाढत्या दरवाढीमुळे पनवेलमधील वडापाव तब्बल १८ रूपयांनी वाढला आहे. वडापावसोबतच भजी प्लेटचीही किंंमत वाढली आहे. वडापावसाठी लागणाऱ्या आवश्यक सामग्रीच्या दरवाढीमुळे व्यावसायिकांनी हा निर्णय घेतला आहे.
प्रत्येकजण घराच्या बाहेर कामानिमित्त जात असतो. त्यामुळे काहीवेळेस कामातून फुरसत न मिळाल्यामुळे वडापाववर आपली भूक भागवत असतो. मात्र या दरवाढीमुळे वडापावचा ग्राहक कमी होतो की काय, अशी चिंता वडापाव विक्रेत्यांना पडली आहे. कारण अनेकांच्या कुटूंबाची गुजराणही या व्यवसायावर असते. नुकतेच जीवनावश्यक असणारा घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयाने महागला आहे. बेसनच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे बेसनाने शंभरी पार केली आहे. याशिवाय खाद्यतेलाच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल आणि हातगाडीवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची किंमतही वाढत आहे. १० किंवा १५ रुपयांना मिळणारा वडापाव आता १८ रुपयांना मिळणार आहे. तसेच, ३० रुपयांची मिसळ ४० रुपयांना मिळत आहे. १० रुपयांचा समोसा, भजी प्लेट आता १५ रुपयांना मिळणार आहे. अतिसामान्यांपासून उच्चभ्रूंच्या जिभेवर वडापावची चव रेंगाळत असतेच. दोन-तीन रुपये दरापासून सुरू झालेला वडापावचा प्रवास अठरा रुपयांपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची भूक भागवणारा रोजचा वडापाव महागल्याने नक्की खायच काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा – Shiv Sena VS Narayan Rane: ‘सामना’ला आता ‘प्रहार’मधून उत्तर देणार, राणेंचा शिवसेनेला इशारा