मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर शहरात आज सकाळी रिक्षा आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की याच १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी आहेत.
रिक्षा आणि बसमध्ये जोरदार धडक झाल्याने हाअपघात घडला आहे. ग्वाल्हेर शहरातील जुनी छावणी परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातीची माहिती एएनआयने आपल्या ट्वीटवरून शेअर केली आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृत्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यानंतर अपघातातील मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत तात्काळ जाहीर केली आहे.
ग्वाल्हेर शहरातील जुनी छावणी परिसरात ही बस आणि रिक्षा परस्पर विरुद्ध दिशेने जात होते. याचदरम्यान बस आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. याचवेळी रिक्षातील नऊ महिला आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जणांना रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसले होते. यात महिला प्रवाशांची संख्या सर्वाधिक होती. एका कार्यक्रमासाठी या महिला स्वयंपाक बनवण्यासाठी एकत्र जात होत्या. याचवेळी रिक्षाच्या समोरून मोरीनाच्या दिशेने जाणाऱ्या बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार गंभीर जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस निरिक्षक रवी भदोरिया यांनी एका वृत्तपपत्राला दिली आहे. यातील मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरु आहे. असेही भदोरिया म्हणाले.
मैं और प्रदेश की जनता दुःख की इस घड़ी में शोकाकुल परिवारों के साथ है। वे स्वयं को अकेला ना समझें।
प्रदेश सरकार की ओर से प्रत्येक मृतक के परिवार को 4 लाख और घायलों को 50 हजार रुपए सहायता राशि दी जायेगी।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 23, 2021
या घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विटरवरून भीषण अपघातावर दु:ख व्यक्त केले. ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाच्या भीषण अपघातात अनेक निष्पाप जिवांचे प्राण गेले. याचे खूप दु:ख होत आहे. मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की, या मृत्यांच्या आत्मास शांती लाभो. तसेच मृतांच्या कुटुबियांना नातेवाईकांना हे दु:ख पचवण्याची ताकद परमेश्वराने देवो. असे ट्वीट चौहान यांनी केले आहे.
तसेच मी आणि मध्यप्रदेशची जनता या शोकाकुल, दु:खद प्रसंगी मृत पावलेल्या कुटुंबियांसोबत आहोत. त्यामुळे त्यांनी स्वत:ला एकटे समजू नये. मध्य प्रदेश सरकारच्यावतीने मृत पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. अशी माहितीही चौहान यांनी दिली आहे. हा अपघात नेमका कसा झाला यांची अधिक तपास आता मध्य प्रदेशचे पोलीस करत करत आहेत.