नवी दिल्लीः वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अदानी समुहाचे प्रमख गौतम अदानी यांचे व्याही सेबीमध्ये आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा खळबळजनक आरोप तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
गौतम अदानी यांचे नातलग सेबीमध्ये आहेत. त्यांच्या आडूनच सर्व हेराफेरी सुरु आहे. दिग्गज वकील सिरील श्रॉफ यांच्या मुलीचा विवाह गौतम अदानी यांच्या मुलासोबत झाला आहे. श्रॉफ हे सेबीच्या एका समितीचे सदस्य आहेत. सेबी जर अदानी यांची चौकशी करणार असेल तर श्रॉफ यांनी हे सदस्य पद सोडायला हवे, अशी मागणी खासदार मोइत्रा यांनी केली आहे.
मोइत्रा यांनी सेबीचे प्रमुख माधबी पुरी बुच यांना पत्र लिहून अदानी समूहाच्या चौकशीची माहिती मागितली होती. सीफओच्या माहितीनुसार सेबीने याचा तपास पूर्ण केला आहे. अदानी समुहाच्या बाजूने न्यायालयाचा निकाल लागला आहे. याचा तपास कधी पूर्ण झाला?, त्याचे निकष काय होते?, तुम्ही न्यायालयात गेला होतात का? असे प्रश्न मोइत्रा यांनी सेबीला विचारले आहेत.
Greatest respect for ace lawyer Cyril Shroff but his daughter is married to Gautam Adani’s son. Shroff serves on SEBI’s Committee on Corporate Governance & Insider Trading. If at all @SEBI_India is examining Adani issue, Shroff should recuse himself.
Perceptions are Reality.— Mahua Moitra (@MahuaMoitra) February 3, 2023
दरम्यान हिडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाने त्यांचा एफपीओ रद्द केला आहे. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण यामार्फत अदानी समुहाने दिले आहे. तसेच पूर्ण झालेले व्यवहार मागे घेतले जात आहेत. आपल्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे अदानी समुहाने परिपत्रकात नमूद केले आहे.
अमेरिकन फर्म हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हे आरोप बोगस आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. अदानी समूहाचे सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी हिंडेनबर्ग रिसर्चवर योग्य संशोधन न केल्याचा आणि कॉपी-पेस्ट केल्याचा आरोप केला आहे. त्यात असेही म्हटले आहे की, त्यांनी एकतर योग्य संशोधन केले नाही किंवा योग्य संशोधन केले पण लोकांची दिशाभूल केली आहे.