नव वर्षानिमित्त देशात अनेक गोष्टींच्या नियमांमध्ये बदल होत असतानाच आता एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमातही बदल झाला आहे. या नियमामुळे आता तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निर्देशानुसार, १ जानेवारी २०२२ पासून एटीएममधून पैसे काढण्याच्या मोफत मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. सध्या बँकांकडून एटीएममधून अधिक वेळा पैसे काढल्यास २० रुपये चार्ज घेतला जातो.यात ग्राहक स्वत:चे खाते असलेल्या बँक एटीएममधून दरमहा पाच वेळा विनामूल्य व्यवहार करु शकतात. तर मेट्रो केंद्रातील इतर बँकेच्या एटीएममधून तीन वेळा तर मेट्रो नसलेल्या केंद्रांमध्ये पाच वेळा विनामूल्य पैसे काढू शकतात.
रिझर्व्ह बँकेने यापूर्वी १ ऑगस्ट २०२१ पासून बँकांना सर्व केंद्रांमधील आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहाराचे इंटरनेट शुल्क १५ रुपयांवरुन १७ रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांचे शुल्क ५ रुपयांवरून ६ रुपये करण्यास परवानगी दिली होती.
आता आरबीआयच्या म्हणण्यानुसार, मोफत व्यवहारानंतर बँका त्यांच्या ग्राहकांकडून प्रति व्यवहार २० ऐवजी २१ रुपये आकारू शकतील. त्यात करांचा समावेश नाही. हा नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे.