देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पण विमान कंपनी एअर इंडियानं ३० एप्रिलपर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकीट विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी सिव्हिल एव्हिएशनकडूनही या संदर्भात माहिती देण्यात आली होती. ‘विमान कंपन्या १४ एप्रिलनंतर कोणत्याही तारखेची तिकीट विक्री सुरू करू शकतात. २५ मार्चला देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तो १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे’, असं सिव्हिल एव्हिएशनचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी सांगितलं होतं.
विमान कंपन्यांवर आर्थिक संकट
देशात झालेल्या कोरोनाच्या फैलावामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे १० टक्के वेतन कपातीचा निर्णय एअर इंडियाने घेतला. मात्र या निर्णयाला वैमानिकांच्या संघटनेनं विरोध केला आहे. हा निर्णय अयोग्य असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका वक्तव्याचीही आठवण करून दिली. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करू नये या पंतप्रधानांच्या वक्तव्याची त्यांनी आठवण करून दिली. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी सीएमडींना एक पत्र पाठवलं ‘हा निर्णय आम्ही स्वीकारत नाही’ असं त्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.