देशात २०० विमानतळ सुरु करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारचे आहे. येत्या काही वर्षांत विमानतळ क्षेत्रात १.६५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले. कोविड-१९ महामारीमुळे विमान वाहतूक क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला. विमान वाहतूक पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे.
आमच्याकडे पुढील चार वर्षात फक्त विमानतळ क्षेत्रात ९८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे, असे सिंधिया म्हणाले. ते म्हणाले की या एकूण रकमेपैकी २५,००० कोटी रुपये भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) द्वारे खर्च केले जातील आणि २२,००० कोटी रुपये विमानतळांच्या विस्तारासाठी आणि नवीन टर्मिनल्सच्या बांधकामासाठी खर्च केले जातील. खाजगी क्षेत्रातील कंपन्या विमानतळ क्षेत्रात नवीन गुंतवणूक म्हणून ६७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकतात, असे देखील सिंधिया यांनी सांगितले.
कोरोनामुळे जवळपास दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती. गेल्या महिन्यापासून म्हणजेच २७ मार्चपासून विमान वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. मॉरिशस, मलेशिया, थायलंड, तुर्की, यूएसए, इराक आणि देशांतील एकूण ६० परदेशी विमान कंपन्यांना उन्हाळी वेळापत्रक २०२२ मध्ये भारतातून आणि भारतासाठी १७८३ फ्रिक्वेन्सी चालवण्यास मान्यता देण्यात आली.
कोरोनामुळे २३ मार्च २०२० पासून सर्व विमान वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी देण्यात आली. मात्र, आंतरराष्ट्रीय विमाम वाहतुकीवरील बंदी कायम ठेवण्यात आली होती. काही काळाने केंद्राने काही देशांसोबत विमान वाहतुक सुरु केली. आता सरकार पूर्णपणे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरु करण्याच्या तयारीत आहे.