कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे दररोज कोट्यावधी रुपयांचा फटका भारतीय रेल्वेला बसत आहे. त्यात आता भारतीय रेल्वेच्या १७ झोन आणि ६८ विभागात अडकलेल्या रेल्वे गाड्या, एकमेकांच्या विभागाकडे परत पाठवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या प्रवासी रेल्वे गाड्या रेल्वे मार्गावर मोकळ्या धावताना दिसून येत आहेत. रेल्वे विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच भारतीय रेल्वे लॉक डाऊनचे उल्लंघन करत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस म्हणजे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला होता. परिणामी भारतीय रेल्वेने आपल्या १७ झोन आणि ६८ विभागातील धावणाऱ्या सर्व रेल्वे प्रवासी गाड्या १४ एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र या लॉक डाऊनमुळे अनेक रेल्वे विभागाच्या गाड्या एकमेकांचे डिव्हिजनमध्ये अडकून पडलेल्या आहेत. ज्या-ज्या विभागाच्या मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या आहेत. त्या-त्या विभागात या रेल्वे गाड्या परत पाठविण्यात येत आहे. कारण अनेक विभागांकडे या गाड्या उभ्या ठेवण्यासाठी जागेची कमतरता असल्याने या गाड्या परत पाठविण्यात येत आहे.
या गाड्या पाठविण्यासाठी प्रत्येकी गाडीमागे ५ लाखांपेक्षा जास्त खर्च येत आहे. अगोदरच कोरोनामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असताना, रेल्वेचा अनागोंदी कारभारामुळे पुन्हा रेल्वेचे मोठ्या प्रमाणात महसुलाचे नुकसान होत असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी ग्रुप संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहाने यांनी केला आहेत. या संबंधित मध्य रेल्वेच्या विभागीय महाव्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, आमचा संपर्क होऊ शकला नाही.
२३ हजार रेल्वे गाड्या
आज जवळ जवळ भारतीय रेल्वेकडे २३ हजार रेल्वे गाड्या आहेत. ज्यात मालवाहतुकीसाठी ८ हजार गाड्या तर लोकल गाड्या ४ हजार ५०० आहेत. उर्वरित ११ हजार मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर, मेमू सारख्या इतर प्रवासी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. आज रेल्वे प्रवासी वाहतूक बंद असल्याने ११ हजार लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या देखभालीसाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक डिव्हिजनमध्ये हलविण्यात येत आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात रेल्वे कर्मचारी गुंतलेले आहे.
मुंबईती जागेची कमतरता
लॉक डाऊनमुळे अनेक लांबपल्ल्याचा रेल्वे गाड्या मुंबई आणि पुणे विभागात अडकल्या आहे. या रेल्वे गाड्या ठेवण्यासाठी मुंबई आणि पुणे रेल्वे विभागात जागा नाही. रेल्वेची मालमत्ता सुरक्षित राहावी आणि या गाड्यांच्या मेन्टेनन्सकरिता सर्व गाड्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचे काम रेल्वेकडून करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया दैनिक आपलं महानगरला नॅशनल रेल्वे मजदूर युनियन वेणू नायर यांनी दिली आहेत.
कोरोनामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. अगोदर रेल्वे फटका बसत असताना, या मोकळ्या गाड्या इकडे तिकडे पाठविण्याची काय गरज आहे. यात रेल्वेच्या महसुलाचे नुकसान होत आहे. तसेच लॉक डाऊनचा अपमान सुद्धा होत आहे. – प्रवीण वाजपेयी, महामंत्री, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ