देशात कोरोना विषाणूचा कहर दिवसागणिक वाढत आहे. देशात सध्या लॉकडाऊन सुरू असूनही कोरोनाबाधितांचा आकडा ६३ हजाराजवळ पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत २,१०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना-संक्रमित लोकांची संख्या वाढून ६२,९३९ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाची ३,२७७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २,१०९ लोकांचा मृत्यू झाला आहे, तथापि १९,३५९ रुग्ण बरे झाले आहेत.
भारताचा रिकव्हरी रेट सध्या ३०.७५ टक्के आहे. त्याचा ग्रोथ रेट ५.२० टक्के आहे. कोरोना संक्रमित रुग्णांच्या बाबतीत तामिळनाडूने दिल्लीला मागे टाकलं आहे. आता तामिळनाडूमध्ये ७,२०० कोरोनाचे रुग्ण आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत संक्रमित लोकांच्या संख्येत सुमारे १० हजारांची वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात तसेच तमिळनाडू येथे वेगाने रुग्ण वाढत आहेत.
हेही वाचा – Coronavirus Update: आज राज्यात १,२७८ कोरोना रुग्णांची नोंद; तर ५३ जणांचा मृत्यू
देशात गेल्या २४ तासांत १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ५३, गुजरातमध्ये २१, बंगालमध्ये १४, दिल्लीत पाच, मध्य प्रदेशात चार, तामिळनाडूमध्ये तीन, राजस्थानात दोन आणि कर्नाटक, पंजाब, ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.