एका १५ वर्षाच्या मुलीने जखमी वडिलांना आपल्या सायकलवर बसवून गुरुग्रामहून थेट बिहार गाठल्याची घटना समोर आली आहे. जवळजवळ एक आठवडा या मुलींने आपल्या वडिलांना मागे बसवून प्रवास केल्यानंतर या दोघांनी बिहार गाठले आहे. या मुलीने एका आठवड्यात तब्बल १ हजार २०० किमीचा प्रवास केला आहे. या मुलीचे नाव ज्योति कुमारी असे आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर ज्योतीवर कौतुकाचा वर्षाव तर झालाच पण तीला खास ऑफऱ मिळाली आहे. ज्योतीला भारतीय सायकलिंग फेडरेशन (सीएफआय) चाचणी घेण्याची संधी मिळणार आहे. यासाठी तीला विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
काय घडले नेमके
गुरुग्राम येथे सातवीत शिकणारी ज्योति आणि तिचे वडिल राहत होते. मात्र, त्यांच्याकडे घर मालकाने पैशाची मागणी केली. तसेच पैसे नसतील तर घर खाली करा असे देखील सांगितले. त्यामुळे त्यांनी घर खाली करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ज्योतिचे वडिल रिक्षा चालक असून सध्या लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचा व्यवसाय देखील बंद आहे. त्यातच त्यांच्या पायाला जखम झाल्यामुळे ते सध्या घरीच होते. त्यामुळे त्यांनी बिहारला स्वत:च्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. याकरता त्यांनी ट्रक चालकाला विचारणा केली असता त्यांनी दोघांच्या प्रवासाचे सहा हजार होतील असे सांगितले. मात्र, त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. अखेर ज्योतिने बाजारात जाऊन ५०० रुपयात सायकल विकत घेतली आणि गुरुग्राम ते बिहार असा सायकलवरुन वडिलांना घेऊन प्रवास केला.
व्हीएन सिंह म्हणाले, ‘आम्ही अशा प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेत आहोत आणि जर मुलीमध्ये अशी क्षमता असेल तर आम्ही तिला नक्कीच संधी देऊ. जर तिने आमचे निकष पूर्ण केले तर आम्ही तिला पूर्ण मदत करू. ज्योतीला परदेशातून आयात केलेल्या सायकलवर प्रशिक्षण देण्यात येईल. लॉकडाउननंतर ज्योतीची चाचणी घेतली जाणार आहे. आमचं तीच्याशी बोलणं झालं आहे. लॉकडाउन संपल्यानंतर जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती दिल्लीला येईल आणि इंदिरा गांधी स्टेडियमवर तीची टेस्ट घेण्यात येईल.
हे ही वाचा – हातात नोकरी नाही, डोक्यावर छत नाही…हताश झालेल्या त्याने अखेर आत्महत्या केली!