राजधानी दिल्लीमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा आहे तर ती म्हणजे दिल्लीच्या खालावत चाललेल्या हवेच्या दर्जाची. दिल्लीमध्ये दिवसेंदिवस वायूप्रदूषण वाढू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये एअर प्युरिफायर्सची मागणी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे अगदी महिन्याभरापूर्वी पर्यंत अस्तित्वाची लढाई करणाऱ्या एअर प्युरीफायर कंपन्यांना आता सुगीचे दिवस आले आहेत. एवढंच नाही, तर त्यांचा व्यवसाय हा तब्बल ३ पटींनी वाढला असल्याचं देखील सांगितल जात आहे. त्यामुळे एकीकडे दिल्लीकरांच्या चिंतेत वाढ झाली असताना त्याचा प्युरीफायर कंपन्यांना मात्र चांगलाच फायदा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दिल्ली सरकारसमोर मोठी समस्या
गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये वायूप्रदूषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता हा दिल्लीकरांसाठी मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. बदलल्या हवामानामुळे आणि ढासळच्या हवेच्या दर्जामुळे दिल्लीकरांना संसर्गाचे आजार होण्याचं प्रमाणही गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने अनेकविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सध्या दिवाळीचा हंगाम सुरू असून या काळात फक्त पर्यावरण पूरक आणि कमी वायू प्रदूषण करणारे फटाकेच वाजवावेत असा आदेशच दिल्ली सरकारने काढला आहे.
दिल्लीत लाख मोलाचं वायूप्रदूषण!
दिल्लीच्या बाजारपेठेमध्ये सध्या ७ हजार रुपयांपासून तब्बल १ लाख रुपयांपर्यंत किंमतीच्या एअर प्युरिफायरची विक्री होत आहे. यामध्ये मल्टिनॅशनल कंपन्यांपासून ते स्थानिक ब्रॅण्डच्या एअर प्युरिफायरचा समावेश आहे. दिल्ली आणि आसपासच्या गुडगाव, नोएडा, फरीदाबाद आणि गाझियाबादमध्ये सर्वाधिक एअर प्युरिफायरला मागणी आहे. विशेष म्हणजे हे प्युरिफायर जरी दिल्लीमध्ये सर्वाधिक खरेदी केले जात असले, तरी जयपूर, कानपूर, वाराणसी, लखनऊ, लुधियाना, चंदीगढ, मुंबई आणि बंगळुरू या शहरांमध्येही प्युरिफायर मागवले जात आहेत.
तुम्ही हे वाचलंत का? – देवपूजेदरम्यान अगरबत्ती, धूप न जाळण्याचा सल्ला
इतर राज्यांमध्येही हवा बदलतेय!
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये वाढणारं वायू प्रदूषण हा प्रकार फक्त उत्तर भारतीय राज्यांमध्येच दिसून येत होता. मात्र, आता इतर राज्यांमध्ये आणि इतर शहरांमध्येही हवेचा ढासळता दर्जा ही समस्या डोकं वर काढू लागली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीप्रमाणेच इतर शहरांमध्येही एअर प्युरिफायरची मागणी वाढू लागली आहे. काही दिवसांपूर्वी हवेतल्या प्रदूषणामुळे अॅलर्जी झाल्याची तक्रार बंगळुरूमध्ये करण्यात येत होती. तर मुंबईमध्ये मेट्रोचं काम आणि शहरातल्या वाढत्या गाड्यांच्या संख्येमुळेही प्रदूषणात आणि हवेतल्या धुलिकणांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे.