शंभर कोटी रुपयांचे वसुली आदेश दिल्याच्या आरोपातील मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या लूकआऊट नोटीसमुळे अनिल देशमुखांना आता देश सोडता येणार नाही. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी आतापर्यंत ५ वेळा समन्स पाठवण्यात आले आहे, मात्र ते ईडीसमोर एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाहीत, त्यामुळे ईडीने लूकआऊट नोटीस जारी करून त्यांना सहावा समन्स पाठवण्याची तयारी केली असल्याची माहिती आहे. याचिकाकर्त्या अॅड. जयश्री पाटील यांनी दावा केला आहे की आता त्यांची अटकही लवकरच होऊ शकते.
लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्याखेरीज देशभरातील विमानतळांनादेखील नोटीस गेली आहे. जेणेकरून देशमुख हे देश सोडून जाऊ शकणार नाहीत. तसा प्रयत्न त्यांनी केल्यास त्यांना विमानतळावरच थांबवले जाईल, असे अॅड. जयश्री पाटील यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लुकआऊट नोटीस बजावल्यानंतर ईडीला देशभरात अनिल देशमुखांचा शोध घेण्याचा अधिकार मिळाला आहे. याशिवाय देशभरातील विमानतळांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. जेणेकरून देशमुख यांना देश सोडायचा असेल तर त्यांना विमानतळावरच थांबवता येईल.
Enforcement Directorate issued a lookout notice against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh in connection with a money laundering case
(File pic) pic.twitter.com/Eg0le4cR4y
— ANI (@ANI) September 6, 2021
आतापर्यंत पाचवेळा ईडीने बजावला समन्स
अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत ५ वेळा समन्स बजावला आहेत. पहिलं समन्स २५ जून रोजी देऊन २६ जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. दुसरे समन्स तात्काळ २६ जून रोजी देऊन ३ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. तिसरे समन्स बजावल्यानंतर ५ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथं समन्स ३० जुलै रोजी पाठवून २ ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानंतर १८ ऑगस्टला पाचवे समन्स १६ ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना १८ ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितले होते. मात्र, देशमुख चौकशीसाठी हजर झाले नव्हते.