लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर असलेले संसद भवनही आता कचऱ्याच्या समस्येने ग्रासले गेले आहे. कचरा पेटीची पुरेशी सोय नसणे आणि वेळेवर साफसफाई न झाल्याने संसदेच्या आवारात कागदी ग्लाससह विविध कचरा साठल्याचा प्रकार आज निदर्शनास आला. त्याची तातडीने दखल घेत केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपाच्या ज्येष्ठ खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आज या परिसरात स्वच्छता अभियान राबविले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत खासदारांनी आज संसद भवन परिसरात झाडू मारून साफसफाई केली. या स्वच्छतेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज सकाळी अनुराग ठाकूर आणि हेमामालिनी यांच्यासह खासदारांनी या मोहिमेत सहभाग नोंदविल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
Isn't parliament premises already super clean.
Such photo ops are unnecessary & looks ridiculous.— Michael Corleone ?? (@_GodfatherAndCo) July 13, 2019
खा. हेमामालिनी आणि अनुराग झाले ट्रोल
स्वच्छ भारत अभियानाचा हेतू उदात्त असला, तरी या बातमीनंतर खासदार हेमामालिनी आणि अनुराग ठाकूर यांना नेटीझन्सने ट्रोल केले आहे. संसदेचा परिसरा हा अतिस्वच्छ असतो, मग येथे कचरा कुठून आला असा प्रश्न काही जण विचारत आहेत. तर अनुराग ठाकूर हेमामालिनी यांच्यापेक्षा चांगला अभिनय करतात अशीही जळजळीत प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. इतर अनेक ठिकाणी खऱ्या अर्थाने कचरा साचलेला असतो. तेथे जाऊन ही मंडळी सफाई अभियान का राबवित नाहीत असाही प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत.