एक्झिट पोलच्या निकालानंतर ईव्हीएमवरून राजकारण तापलेलं असतानाच माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आयएलएसपी) नेते उपेंद्र कुशवाह यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘कुणी निवडणुकीचे निकालच चोरण्याचा प्रयत्न करणार असेल तर मतरक्षणासाठी आम्हाला शस्त्रे हाती घ्यावी लागतील’, अशी धमकी दिली आहे.
Upendra Kushwaha, RLSP in Patna: Vote ki raksha ke liye zaroorat pade toh hathiyaar bhi uthana ho toh uthaiye. Aaj jo result loot ki jo ghatna karne ki jo koshish ho rahi hai toh isko rokne ke liye hathiyaar bhi uthana ho toh uthana chahiye. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/g29bsWGyre
— ANI (@ANI) May 21, 2019
जर निकालात फेरफार करून एनडीएच्या बाजूने निकाल दिला; तर जनतेचा रोष वाढून रस्त्यावर रक्त्याचे पाट वाहतील, असे त्यांनी म्हटले आहे. मताच्या सुरक्षेसाठी गरज पडल्यास हत्यार उचला. आज निकालाच्या लुटीचा जो प्रयत्न केला जात आहे तो रोखण्यासाठी हत्यार उचलले पाहिजे, असेही वक्तव्य त्यांनी केले. कुशवाह यांनी याबाबत आज संयुक्त परिषद घेतली. यावेळी आरजेडी राज्य अध्यक्ष रामचंद्र पूर्वे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन आणि आघाडीतील अन्य नेते उपस्थित होते. एक्झिट पोलमध्ये बिहारमधील ४० जागापैंकी ३० हून अधिक जागा एनडीएला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कुशवाह यांनी केला आहे.
बिहारमध्ये राजद कार्यकर्त्यांनी ईव्हीएमने भरलेली गाडी पकडली आहे. त्याबाबत विचारले असता कुशवाह यांनी केंद्र सरकार, बिहार सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘मतदान हे सर्वोच्च दान आहे. आपले जीवन आणि आपली प्रतिष्ठा जितकी महत्त्वाची आहे तितकंच लोकशाहीमध्ये मतदानाला महत्त्व आहे. त्यामुळे मतरक्षणासाठी गरज पडल्यास आम्ही शस्त्रे हाती घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे कुशवाह यांनी सांगितले. ईव्हीएममध्ये फेरफार होण्याची शक्यता व्यक्त करत अशाप्रकारे मतांची चोरी करून जिंकण्याचा विचार कुणी करत असेल तर त्यांनी वेळीच हा उद्योग बंद करावा अन्यथा जनतेत खदखदत असलेल्या असंतोषाचा स्फोट होईल. भविष्यात जी स्थिती उद्भवेल त्याला सरकार आणि प्रशासनात बसलेल्या व्यक्तीच जबाबदार राहतील, अशी धमकीच कुशवाह यांनी दिली.