हिरा व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरु झाली आहे. भारतानं फरार आरोपी मेहुल चोक्सीच्या प्रत्यर्पणासाठी अँटिग्वा सरकारला अर्ज पाठवला आहे. चोक्सीच्या प्रत्यर्पणासाठी भारतीय अधिकारी बऱ्याच प्रमाणात प्रयत्न करत आहेत. सीबीआयनं यासाठी अँटिग्वा सरकारकडून माहिती मागवून घेतली होती. तर अँटिग्वामधून मेहुलच्या वकिलानं मागच्याच आठवठ्यात एक स्पष्टीकरण असणारं पत्र निर्गमित केलं होतं. ज्यामध्ये आपल्या अशीलानं कायद्याचं पालन करून अँटिग्वा आणि बारबुडाचं नागरिकत्व पत्करलं असल्याचं म्हटलं होतं. यामध्ये सांगण्यात आल्यानुसार, मेहुलनं व्यापाराच्या विस्ताराच्या गुंतवणुकीसाठी हे नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केला होता.
India formally hands over extradition request to Antiguan authorities for #MehulChoksi pic.twitter.com/bd02mrDyxh
— ANI (@ANI) August 5, 2018
पोलीस तपासावरदेखील प्रश्नचिन्ह
शनिवारी मुंबई पोलिसांनीदेखील मेहुल चोक्सीच्या पोलीस व्हेरिफिकेशनच्या क्लिअरन्स सर्टिफिकेट निर्गमित करण्याच्या बाबतीत तपासाचे आदेश दिले आहेत. फरारी मेहुल चोक्सीला नागरिकता देण्याच्या बाबतीत अँटिग्वानं पोलीस क्लिअरन्स मिळाल्यानंतरच नागरिकता दिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं पोलीस तपासावरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पंजाब नॅशनल बँकेसह १३४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेहुल चोक्सी फरार झाला असून सध्या त्याच्याविरोधान रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. यामध्ये त्याचा भाचा नीरव मोदीचं नावदेखील आहे.
८ जुलैला फरार झाला होता मेहुल
तपास यंत्रणांच्या अंदाजानुसार, मेहुल चोक्सीला तपासाबाबत कोणीतरी माहिती पुरवत आहे. कारण इंटरपोलनं ९ जुलैला त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढली होती. मात्र, तपास यंत्रणेला त्याआधी एक दिवस ८ जुलैला मेहुल चोक्सी फरार झाल्याची माहिती मिळाली. ८ जुलैलाच मेहुल चोक्सी जेट ब्ल्यू एअरवेजच्या फ्लाईटमधून अँटिगाला पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. मेहुल चोक्सीला त्याच्या अटक होण्याची बातमी आधीच मिळाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.