‘निती आयोगाने रेल्वे बोर्डाला पत्र लिहून देशातील १५० रेल्वे गाड्या आणि ५० रेल्वे स्थानके यांचे खासगीकरण करण्याकरिता कारवाई करण्याचा दिलेला आदेश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा केलेला विश्वासघात आहे. तसेच भारतीय रेल्वे ही खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव आहे’, अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला जाहीर आश्वासन दिले होते की, कोणत्याही परिस्थितीमध्ये रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नाही. रेल्वेवर त्यांचे अतिशय प्रेम असून बालपणीपासून आपला रेल्वेशी संबंध राहिला आहे. निती आयोगाने घेतलेला निर्णय हा मोदींनी जनतेला दिलेल्या वचनाचा भंग आहे. भारतीय रेल्वे ही गोरगरिबांच्या रोजगाराशी आणि उपजिवीकेशी जोडलेली जिवनवाहिनी आहे. तर देशाच्या कानाकोपऱ्यातील दुर्गम भागांना गोरगरिब वस्त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम रेल्वे करते. रेल्वे गरिब जनतेचे दळणवळणाचे हक्काचे साधन असून हेच साधन खासगी उद्योजकांच्या घशात घालून जनसामान्यांचा हक्क काढून घेण्याचे हे सुनियोजीत कारस्थान आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष याचा निषेध करत तीव्र विरोध करत आहे, असे ही खर्गे यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा – भारतीय रेल्वेची गाडी सुसाट; सेनादलाचा पराभव करत पटकावले जेतेपद