“मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबईवर १० अतिरेक्यांनी दहशतवादी हल्ला केला, मात्र त्यांनी मुस्लिमांना या हल्ल्यातून वाचवले.”, असे धक्कादायक ट्विट मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले आहे. आज देशभरातून या हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांना आणि हल्ला परतवून लावताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मात्र मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केलेल्या ट्विटमुळे शहिददिनाला गालबोट लागले आहे.
तथागत रॉय यांनी नंतर हे ट्विट डिलीट केले असले तरी त्याचा स्क्रिनशॉट आता व्हायरल होतो आहे. “२६/११ आज दहा वर्ष होत आहेत. पाकिस्तान पुरस्कृत खाटीकांनी निष्पाप (मुस्लिम वगळून) लोकांचा बळी घेतला. कुणाला लक्षातही नाही की आपण पाकिस्तानसोबतचे संबंध का तोडत नाहीत किंवा त्यांच्यासोबत युद्ध का करीत नाही?” असा मजकूर रॉय यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिला होता.
आपले पहिले ट्विट डिलीट केल्यानंतर रॉय यांनी पुन्हा एक ट्विट केले. ज्यात त्यांनी म्हटले की, “मला २६/११ च्या हल्ल्याबद्दल चुकीची माहिती मिळाली. या हल्ल्यात काही मुस्लिम व्यक्तिंचाही मृत्यू झालेला आहे. माझे ट्विट मी डिलीट केले असून त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करत आहे.”
मात्र त्यांनी दिलेल्या खुलाश्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यामुळे त्यांनी ते ही ट्विट डिलीट केले. आता त्यांनी नवीन ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, २६/११ बाबत केलेले ट्विट चुकीचे होते. त्यामुळे दिलगीरी व्यक्त करत मी दोन्ही ट्विट डिलीट केले आहेत.
The tweet relating to 26/11 contained a factual mistake. It has been deleted with apologies. No further enquiries please
— Tathagata Roy (@tathagata2) November 26, 2018