नवी दिल्ली : नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतरांगांमध्ये भारतीय गिर्यारोहक खोल दरीत पडल्यानंतर सोमवारपासून (10 एप्रिल) बेपत्ता झाला होता. बेपत्ता असलेला गिर्यारोहक (Mountaineer) अनुराग मालू (Anurag Malu) 10 दिवसांनी गंभीर अवस्थेत बचावकर्त्यांना जिवंत सापडला आहे, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. याबाबत गिर्यारोहकाच्या भावाने गुरुवारी ही माहिती दिली आहे.
राजस्थानमधील (Rajasthan) किशनगड येथे राहणारा 34 वर्षीय अनुराग मालू मागील आठवड्यात नेपाळमध्ये असणाऱ्या जगातील सर्वाधिक उंचीच्या शिखरांपैकीच एक अशा अन्नपूर्णा शिखराच्या चढाईसाठी गेला होता. त्याचवेळी कँप 4 वरून कँप 3 पर्यंत येत असताना तिसऱ्या कँपखाली असणाऱ्या सुमारे 6,000 मीटर खोल हिमदरीत तो कोसळला आणि बेपत्ता झाला. 8 हजार मीटरहून अधिक उंचीच्या 14 शिखरांवर चढाई करण्याच्या मोहिमेसाठी अनुराग मालू निघाला होता, अशी माहिती गिर्यारोहण उपक्रम आयोजन करणाऱ्या संस्थेशी संलग्न एका अधिकाऱ्याने माध्यमांना माहिती दिली आहे.
Anurag Maloo has been rescued alive from Mount Annapurna.
“He is currently at Manipal Hospital under doctor supervision,” confirms Mingma Sherpa from Seven Summit Treks to ANI https://t.co/khlagJc2mD
— ANI (@ANI) April 20, 2023
एक अनुभवी गिर्यारोहक असूनही अनुराग अन्नपूर्णा शिखरावरून खाली उतरताना मृत्यूच्या दरीत कोसळला होता. भारतीय शासनापर्यंत ही माहिती पोहोचली आणि त्याचा शोध घेण्याच्या मोहिमेला वेग आला. 10 दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर अनुराग मालू गुरुवारी (20 एप्रिल) जिवंत सापडला, पण त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या भावाने माहिती दिली की, “तो जिवंत सापडला असून त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्हाला त्याच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
ऑपरेटर “सेव्हन समिट ट्रेक्स” ने पुष्टी केली की, अनुरागला सुमारे 300 मीटर खाली असलेल्या घाटात सात नेपाळी गिर्यारोहक जिवंत सापडला. त्यानंतर त्याला पोखरा येथील मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले आहे. सेव्हन समिट ट्रेक्सचे महाव्यवस्थापक थानेश्वर गुरगेन म्हणाले की, “त्याची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत.”
गिर्यारोहक अनुरागच्या कुटुंबीयांना तो सापडल्याीच माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अनुरागला नवसंजीवनी मिळाल्याचे म्हणणे होते, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ते चिंतेत आहेत. जागरूकता पसरवण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्रांची जागतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुराग सात खंडांवरील 8 हजार मीटरवरील सर्व 14 पर्वत शिखरे सर करण्याच्या मोहिमेवर होता.