भारतात कोरोनाची तिसरी लाट आली असून पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण चर्चा मात्र ओमीक्रॉनची आहे. ओमीक्रॉन हा एक सौम्य लक्षण असलेला व्हायरल ताप आहे. जो साधारण औषधांनीही बरा होतोय. मग असे असताना देश लॉकडाऊनचा विचार का करत आहे. असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
शाळा कॉलेजेस पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहेत. काही राज्यांमध्ये जिम,चित्रपटगृहेसह मॉलही बंद करण्यात आले आहेत. दिल्लीनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात वाढत आहेत. यामुळे काही दिवसांपूर्वी नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे ज्या राज्यांमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत तिथे मात्र हजारोंच्या गर्दीने रॅलि काढण्यात येत आहेत. तर राजकारणी मंडळींचे लग्नसोहळेही गर्दीत होत आहेत. याचदरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ओमीक्रॉन हा व्हायरल ताप असल्याचे सांगितलं. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ओमीक्रॉन हा साधा ताप असल्याचे म्हटले आहे.
तर ओमीक्रॉन झालेल्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागल्याचे किंवा आयसीयूमध्ये नेण्याची वेळ येत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ओमीक्रॉन रुग्ण घरातच चार पाच दिवसात बरे होत आहेत. मग असे असताना ज्या देशात ९० टक्के लोकांनी लसीचा पहीला डोस आणि ६५ टक्के लोकांचे दोन्ही डोस झालेले आहे तिथे लॉकडाऊन करण्याची काय आवश्यकता आहे असा प्रश्न सामान्यांच्या डोक्यात घोळत आहे. ओमीक्रॉनचा संसर्ग वेग अधिक आहे. यामुळे त्यातच सहव्याधी असलेल्यांसाठी तो धोकादायक ठरू शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
त्यातच मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी केल्यानंतर त्यात ५५ टक्के सॅम्पलमध्ये ओमीक्रॉन आढळला. तर इतरांना डेल्टाची लागण झाली आहे. ओमीक्रॉनच्या तुलनेत डेल्टा घातक व्हायरस आहे. तसेच काही देशांमध्ये ओमीक्रॉन आणि डेल्टा यांची लागण झालेल्यांमध्ये डेल्मिक्रॉन हा म्युटंट आढळला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.