सरकार बदलते तसा महापुरुषांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलतो. सत्तेवर आरूढ होणारा कोणताही पक्ष आपल्या विचारांच्या महापुरुषांचा अधिकाधिक प्रचार कसा होईल? याकडे लक्ष देतो. तर दुसऱ्या बाजुला विरोधी विचारधारेच्या महापुरूषांचा विरोध करतो. हे दुर्दैवी असले तरी भारतातील सत्य आहे. राजस्थानमध्ये नुकतेच सत्तांतर झाले आहे. भाजप सरकार जाऊन तिथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. सत्ताबदल होताच आता काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्रवीर सावरकर यांचा इतिहास बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्ष २०१७ साली भाजप सरकारने अभ्यासक्रमात सावरकरांचा इतिहास समाविष्ट केला होता. भाजपने सावरकरांना हिंदुत्वाचे पाईक, महान क्रांतीकारी आणि स्वातंत्रवीर म्हणून संबोधले होते. मात्र काँग्रेस सरकार त्यामध्ये बदल करणार असल्याची माहिती मिळत आहे. याबद्दल माहिती देताना राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह म्हणाले की, “भाजपने शिक्षण खात्याला स्वतःची प्रयोगशाळा बनवली होती. भाजपला फायदा होईल त्याप्रमाणे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या व्यक्तीचा उदोउदो करण्यात आला.” गोविंदसिंह पुढे म्हणाले आहेत की, सरकार अभ्यासक्रम ठरवत नाही. त्यासाठी शिक्षकांची समिती नेमलेली असते. ती समितीच अभ्यासक्रमात काय असावे? याबद्दल निर्णय घेत असते. त्यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो.
“वीर सावरकर हे अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेला कंटाळले होते. यासाठी त्यांनी इंग्रजांची चार वेळा माफी मागितली आणि मग तुरुंगातून बाहेर आले.” असा नवा संदर्भ सत्तेत आलेल्या राजस्थान सरकारने अभ्यासक्रमात टाकला आहे. दहावीच्या अभ्यासक्रमात महापुरुषांबद्दल इतिहास शिकवला जातो. काँग्रेसनेच इतिहासाशी छेडछाड केलीये असे नाही. मागच्या भाजप सरकारने देखील पंडित जवाहरलाल नेहरू यांचा धडाच बाद केला होता.