राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी भिवंडी कोर्टाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना १६ मार्च २०१९ ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आधी याप्रकरणी १२ जूनला झालेल्या सुनावणी दरम्यान राहुल गांधींवरील आरोप निश्चित झाले होते. दरम्यान, हे आरोप राहुल गांधी यांनी फेटाळून लावत कायदेशीर लढाई लढणार असल्याचे म्हटले होते. राहुल गांधी यांच्यावर आयपीसीच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते. या सुनावणी दरम्यान राहुल गांधींनी कोर्टात हजेरी लावाली होती.आपण निर्दोष असल्याच्या दाव्याचा यावेळी राहुल गांधींनी पुनरुच्चार केला होता.
Maharashtra: RSS defamation case against Rahul Gandhi adjourned till 16th March 2019 by Bhiwandi Court (file pic) pic.twitter.com/NMIPnlxtb4
— ANI (@ANI) December 15, 2018
काय आहे प्रकरण ?
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी तत्कालीन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘महात्मा गांधींच्या हत्येला आरएसएस जबाबदार आहे’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी आरएसएसच्या भिवंडी शाखेचे सचिव राजेश महादेव कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. मार्च २०१५ मध्ये या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ‘राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांमुळे ते न्यायालयात हजर राहू शकणार नाहीत’, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, नोव्हेंबर २०१६ मध्ये राहुल गांधी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली होती.