नवी दिल्लीः युक्रेन आणि रशियामधील युद्ध (Russia Ukraine Crisis) दिवसेंदिवस भयावह रूप धारण करीत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तर अण्वस्त्रे तयार ठेवण्याचे आदेश दिलेत, एवढी परिस्थिती इतकी गंभीर झालीय. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने लोक युक्रेनमधून स्थलांतर करून शेजारील देशांमध्ये आश्रय घेत आहेत. त्याचबरोबर भारत सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवत आहे.
एअर इंडियाचे पाचवे विमान आज दिल्ली विमानतळावर उतरले
कीवमधून आतापर्यंत 1100 हून अधिक भारतीय सुखरूप परतलेत. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात नागरिक तेथे अडकलेत. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणणारे एअर इंडियाचे पाचवे विमान आज दिल्ली विमानतळावर उतरले. बुखारेस्ट (रोमानिया) मार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या 249 विद्यार्थी आणि इतर भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे विमान (AI 1942) सोमवारी सकाळी 6.30 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.
आतापर्यंत पाच विमानांनी उड्डाण केले
‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत बुखारेस्टहून 219 नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे पहिले विमान शनिवारी (26 फेब्रुवारी) मुंबईत दाखल झाले. तर बुखारेस्टहून 250 भारतीय नागरिकांसह दुसरे विमान रविवारी (27 फेब्रुवारी) रात्री 2.45 वाजता दिल्ली विमानतळावर उतरले. त्याच वेळी 240 लोकांना घेऊन तिसरे विमान रविवारी (27 फेब्रुवारी) सकाळी 9.20 च्या सुमारास दिल्लीत दाखल झाले.
The fifth Operation Ganga flight, carrying 249 Indian nationals stranded in Ukraine, departed from Bucharest (Romania) reaches Delhi airport pic.twitter.com/yKhrI5fmwm
— ANI (@ANI) February 28, 2022
1156 भारतीय सुखरूप मायदेशी परतले
बुखारेस्ट येथून टाटा समूहाद्वारे संचालित कंपनीचे फ्लाइट (चौथे) 198 भारतीय नागरिकांसह रविवारी (27 फेब्रुवारी) संध्याकाळी 5.35 वाजता राष्ट्रीय राजधानीत पोहोचले. 13,000 हून अधिक भारतीय नागरिक अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत, ज्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी सकाळी पाचवे विमान भारतात दाखल होताच युक्रेनमधून ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत सुटका करण्यात आलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांची संख्या 1156 वर पोहोचलीय.
हेही वाचाः राज्यपाल कोश्यारींच्या शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानानं खळबळ