भारतीय अर्थव्यवस्था सध्या गटागंळ्या खात आहे. जीडीपीने मागच्या ९ वर्षातील निच्चांकी दर गाठला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी केवळ ५ टक्के इतका होता. दुपारी सेन्सेक्स तब्बल ८०० अकांनी घसरला होता. त्यानंतर आता सहा वाजता ७६९ अंकाची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टीतही २२५ अंकाची घसरण झालेली आहे. शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेसेंक्स ३६,५६२ आणि निफ्टी १०,७९७ अकांवर होते.
केंद्रीय अर्थमंत्री यांनी मागच्या आठवड्यात दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन अर्थव्यवस्थेबद्दल माहिती दिली होती. देशातील २७ राष्ट्रीय बँकाचे एकत्रीकरण होऊन त्याची संख्या १२ वर आणली जाणार आहे. या निर्णयानंतर शेअर बाजाराला त्याचा फायदा होईल, असे सांगितले जात होते. मात्र तसे कोणतेही सकारात्मक परिणाम आज दिसले नाहीत.
मंगळवारी सुट्टीनंतर जेव्हा बाजार उघडला तेव्हा सकाळपासून घसरण पाहायला मिळत होती. दिवसभरात ७६९ अंकानी बाजार कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे २.७९ लाख कोटींचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे. जगभरात सध्या मंदीचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिका आण चीन सारख्या देशांमध्ये ट्रेड वॉर सुरु असल्यामुळे आशियाई देशांच्या बाजारावर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी रविवारी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती. नोटबंदी आणि जीएसटी कर लावण्याचे निर्णय घिसाडघाईत घेतल्यामुळेच देशात आर्थिक मंदी आल्याचा आरोप त्यांनी केला होता.