अफगाणिस्तानमध्ये ISIL – K या दहशतवादी संघटनेची उपस्थिती आणि क्षमता लक्षणीयरित्या वाढतेय. यासोबत पाकिस्तानस्थित लष्कर- ए- तोय्यबा आणि जैश – ए- मोहम्मद यांसारख्या बंदी घातलेल्या संघटनांशी असलेले संबंध आणि इतर दहशतवादी गटांची चिथावणीखोर वक्तव्ये यामुळे प्रदेशातील शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण झाला आहे. असे विधान भारताने संयुक्त राष्ट्रात केले आहे.
काबूलमधील शीख गुरुद्वारावर 18 जून रोजी झालेला हल्ला आणि 27 जुलै रोजी त्याच गुरुद्वाराजवळ झालेला दुसरा बॉम्बस्फोट यासह अल्पसंख्याक समुदायाच्या धार्मिक स्थळांवर होत असलेले हल्ले अत्यंत चिंताजनक असल्याचे भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा यांनी सांगितले. रशियाच्या विनंतीवरून सोमवारी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (UNSC) बैठक बोलण्यात आली. या बैठकीत भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या की, आम्ही सुरक्षा परिषदेत वारंवार सांगितले की, अफगाणिस्तान हा एक जवळचा शेजारी आणि दीर्घकाळ टिकणारा भागीदार देश आहे. अफगाण लोकांशी आमचे मजबूत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. यामुळे तिथे शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यातच भारताचे हित आहे.
कंबोज यांनी बंदी घातलेले दहशतवादी, दहशतवादी संघटना किंवा त्यांच्याशी संलग्न असलेल्या इतर व्यक्ती आणि संस्थांना अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही समर्थन मिळणार नाही याची खात्री करण्यासाठी सुरक्षा परिषदेच्या गरजेवर भर दिला. भारताने नेहमीच अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकारचा पुरस्कार केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या महिन्यात चीन सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सुरक्षा परिषदेला सांगितले की, भारताने आपल्या शेजारच्या धर्माची भूमिका बजावत अफगाण लोकांना मदत म्हणून आतापर्यंत 40 हजार टन गहू पाठवला आहे. यासोबतच भारताने 32 टन वैद्यकीय उपकरणे आणि औषधे पाठवली आहेत. यामध्ये टीबीची औषधे आणि कोरोना लसीचे पाच लाख डोस यांचा समावेश आहे. तालिबानने गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर कब्जा केला, त्यानंतर अफगाणवर तालिबान्यांची सत्ता स्थापन झाली.