झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये मजेशीर घटना घडली आहे. येथे चक्क एका नवऱ्याच्या बायकोने आणि त्याच्या गर्लफ्रेंडने त्याची वाटणी केली आहे. या वाटणीनुसार आठवड्यातील ३ दिवस त्याला बायकोबरोबर आणि इतर ३ दिवस गर्लफ्रेंडबरोबर राहावे लागणार आहे. राजेश महतो असे त्याचे नाव असून राजेशचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. आपण अविवाहीत असल्याचे त्याने तिला सांगितले होते. नंतर घरातून पळून जाऊन त्याने तिच्याशी लग्नही केले. इकडे पती अचानक बेपत्ता झाल्याने पहिल्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. तर तिकडे दुसऱ्या पत्नीबरोबर राजेशने नव्या संसाराची सुरुवातही केली होती.
अखेर पोलिसांनी राजेशला शोधून काढले तेव्हा तो विवाहीत असून दोन मुलांचा पिता असल्याचे दुसऱीला कळाले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळताच दुसऱ्या पत्नीने पोलिसांत राजेशची तक्रार केली. यामुळे राजेशने पहिल्या पत्नीचे घर गाठले. यानंतर पत्नीला त्याने सगळा घडलेला प्रकार सांगितला. तर दुसरीकडे विवाहीत असतानाही राजेशने दुसरे लग्न केल्याने पोलिसांनी राजेशविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
दरम्यान कोर्टानेही राजेशला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पण आता पतीला वाचवण्यासाठी दोन्ही बायका एकत्र आल्या असून पोलिसांसमोर त्यांनी आपल्या तक्रारीही मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच आठवड्यातील तीन तीन दिवस राजेशला वाटून घेतले असल्याने या जोडप्यांची सध्या गावभर या अजब वाटणीची जोरदार चर्चा सुरू आहे.