घरसंपादकीयदिन विशेषस्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले

स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले

Subscribe

सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातार्‍यातील नायगाव याठिकाणी झाला. १८४० मध्ये जोतीराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.

सार्‍या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. या यशस्वी शाळांना सनातनी उच्च वर्णीयांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मात्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले.

- Advertisement -

अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. सावित्रीबाईंनी काही क्रूर रूढींनाही आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले.

सावित्रीबाईंनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६-७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. अशा या कर्तृत्ववान शिक्षिकेचे १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -