घरताज्या घडामोडीइथे ओशाळला कोरोना

इथे ओशाळला कोरोना

Subscribe

डॉ. योगेश कुलकर्णी यांचे मोठे योगदान, होमिओपॅथीद्वारे ७०० पेक्षा अधिक रुग्ण ठणठणीत बरे, मृत्यू एकही नाही.

कोरोना महामारीच्या या कठीण काळात वादळात घट्ट पाय रोवून उभे राहावे याप्रमाणे देशात, राज्यात अनेक डॉक्टर्स सेवाभावीवृत्तीने रुग्णसेवेचे कार्य करीत आहेत. मानवता गर्व बाळगेल अशा या नामावलीतील अग्रगण्य नाव म्हणजे नाशिक मधील नामवंत होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. योगेश कुलकर्णी हे होय. मार्चपासून आजतागायत पर्यंत रुग्णसेवेचा हा मानवतेचा यज्ञ अंखडीत सुरू असून नाशिक, महाराष्ट्र यासह संपूर्ण भारतातील ७०० पेक्षा अधिक रुग्ण त्यांनी प्रत्यक्ष तपासून वा टेलिमेडिसीन यंत्रणेद्वारे (टेलिग्राम/व्हाटसॲप) पूर्ण बरे केले आहेत. यात सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांचा समावेश आहे. ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना घरीच ती सुविधा घ्यायला सांगून होमिओपॅथी औषधांद्वारे त्यांना ठिक करण्यात आले आहे. यात वयाच्या सत्तरी ओलांडलेल्या अनेक रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ते कोविड रुग्णांवर विनामूल्य उपचार तर करीत आहेतच परंतु त्याचबरोबर नाशिक शहर आणि जिल्ह्यात त्यांनी प्रतिबंधात्मक औषधाच्या गोळ्यांचे चाळीस हजारपेक्षा जास्त लोकांना मोफत वाटप केले आहे.

माझ्या नाशिक भेटीत डॉक्टरांची या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी वेळ मागून घेतली. ते माझे आणि माझ्या कुटुंबियांचे २० वर्षापासून फॅमिली डॉक्टर असल्याने त्यांनी रुग्णसेवेच्या व्यस्त वेळापत्रकातही वेळ दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणता कमीत कमी ४ ते जास्तीत जास्त ११ दिवसात रुग्णांची एकूण प्रकृती, लक्षणे बघून होमिओपॅथिक औषधांद्वारे ठिक करण्यात आले. होमिओपॅथिक तत्वांच्या आधारावर प्रत्येक व्यक्ती अनुरूप ते रुग्णांना महात्मा गांधी रोड, नाशिक येथील त्यांच्या क्लिनिकमध्ये उपचार देतात. आरोग्य मंत्रालय आयुष विभागाने जानेवारी, २०२० मध्ये प्रतिकार शक्ती वाढविण्यासंदर्भात आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथिक औषधाची शिफारस केली. डॉ. कुलकर्णी मात्र कॅम्फोरा १ एम चा आग्रह त्यावेळी आणि आताही करतात. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले – हे परिपत्रक निघाले तेव्हा भारतात कोविडचा प्रादुर्भाव झालेला नव्हता. या उलट इराणसह अन्य अनेक देशात जानेवारी, फेब्रुवारीत रुग्णांवर कॅम्फोरा १ एम अत्यंत गुणकारी ठरत असल्याचा डेटा उपलब्ध झाला होता. कॅम्फोरा १ एमचे वितरण मोठी मोहीम हाती घेऊन करण्यात आले असते तर भारतातील एकूण रुग्णसंख्या, मृत्यूसंख्या नक्कीच आणखी कमी झाली असती.

- Advertisement -

Like Cures Like अर्थात, काट्याने काटा काढणे हे होमिओपॅथीचे मुख्य तत्व आहे. शरीरात शिरलेल्या विषाणू विरोधात संरक्षक पेशी सक्रीय होऊन त्यांना अटकाव करतात त्यावेळी आपल्याला ताप येतो. विषाणू जास्त शक्तीशाली असतील तर प्रतिकार अधिक तीव्र होऊन ताप वाढतो. ताप कमी करण्यावर जोर देण्यापेक्षा शरीराअंतर्गत संरक्षक पेशी अधिक सक्रीय आणि ताकदवान बनविण्यास प्राधान्य होमिओपॅथी देते. ताप ही प्रतिक्रिया शरीराच्या संरक्षक प्रणालीशी निगडीत आहे. शरीराअंतर्गत नैसर्गिक प्रतिकारशक्तीला आपण दाबून टाकणे योग्य नाही. सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या अनेक रुग्णांचा रुग्णालयात दाखल झाल्यावर २ ते ४ दिवसात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. कोविड रुग्णांच्या फुफ्फूसाला हानी पोहोचल्यावर त्यात द्रव तयार होतो. हा द्रव पदार्थ शरीराअंतर्गत पेशी शोषून घेतात, त्याचे धोकादायक प्रमाण योग्य उपचाराअंती कमी ही होते. मात्र अनेक घटनांमध्ये इंजेक्शनमुळे हा द्रव गोठला जाणे आणि त्यामुळे रुग्णाचा २ ते ४ दिवसात मृत्यू होणे असे दुर्दैवी प्रकार घडले आहेत. माझ्या रुग्णांना मी कोणत्याही परिस्थितीत हा धोका आपण पत्करायचा नाही असे बजावत आलो आहे. विषाणूचा शरीरावर आघात होऊन गुंतागुंत निर्माण होऊ नये यासाठी शरीर बचावाचे सर्व उपाय योजते. फुफ्फुसावर होणारे inflammation (फुफ्फुस दाह ,सूज) हा बचावाचा भाग आहे. कोरोना विषाणू शरीराकरिता नवीन असल्याने बचाव म्हणून inflammation जास्त होते. ते शरीराच्या मदतीसाठीच असते, परंतु ह्या आक्रमक inflammation ला “Cytokine Storm” अशी संज्ञा देण्यात आली आहे. वैद्यकीय शास्त्रात Storm, War असे शब्द गैरलागू ठरतात, परंतु मोठ्या फार्मा कंपन्या अशा शब्दांचा वापर करून ठराविक औषधांचा, इंजेक्शनचा मारा करतात. त्यामुळे शरीराचा बचाव करणारी यंत्रणा व्यवस्थित काम करेनाशी होते. गुंतागुंत वाढत जाते आणि रुग्ण गंभीर होतात. शरीरातील हा बचाव म्हणजेच शरीराची प्रतिकार शक्ती (immunity) होय. होमिओपॅथीमध्ये या प्रतिकारशक्तीलाच अधिक सक्रीय आणि सक्षम करण्यावर भर दिला जातो अशा शब्दात डॉ. योगेश कुलकर्णी यांनी कोविड-१९ च्या उपचारा संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली.

नाशिकमध्ये त्यांच्या मित्रपरिवारातील काही Allopathy च्या डॉक्टरांना कोविडचा संसर्ग झाल्यावर त्यांनीदेखील रुग्णालयात दाखल व्हायचे नसल्याने डॉ. कुलकर्णी यांच्याकडून होमिओपॅथी उपचार घेतले. मार्च पासून ते आता ऑक्टोबरपर्यंत त्यांनी क्लिनिक सुरू ठेऊन कोविड नसलेल्या रुग्णांवरही उपचार केले, जेव्हा अन्य रुग्णालय, डॉक्टर्स यांनी सेवा बंद ठेवली होती. त्यामुळे अशा रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.

- Advertisement -

भारतात कोविडची दुसरी लाट येणार नाही, आलीच तरीही त्याची व्याप्ती आणि घातकता मे, जून मधील परिस्थितीपेक्षा कमीच असेल, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.

कुटुंबात कोणाला कोविडचा संसर्ग झाल्यास त्यांच्यावर घरातच योग्य उपचार करण्यास इतर सदस्यांनी प्राधान्य द्यावे. माझी पत्नी अमेरिकेवरून आल्यावर तिला काही दिवसांनी संसर्ग झाला पण आम्ही एकत्रच राहिलो. मी तिच्यावर उपचार करत असल्याने, तिच्या संपर्कात असल्याने, या काळात क्लिनिकमध्ये न जाता घरूनच टेलिग्राम ॲपवर रूग्णांना सेवा दिली. प्रोटोकॉल कालावधी संपल्यावर पुन्हा क्लिनीकला नियमित हजेरी लावत आहे.

प्रतिपिंडा इतकेच (Antibodies) शरीरातील मेमरी सेलला महत्व आहे. एकदा कोरोना होऊन गेलेल्यांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता नाही, कोरोना रुग्णांच्या संपर्कात येवून गेलेल्यांना देखील कोरोना होण्याचा धोका कमी संभवतो. जितके जास्त लोकं कोरोनाशी एक्सपोज होतील तितके ते समाजाच्यादृष्टीने फायदेशीर ठरेल. परिणामकारक लस आणि त्यांची अंमलबजावणी हा ५ वर्षाचा कार्यक्रम आहे, कोरोना विषाणू नव्यानेच आला असल्याने १ वर्षात ते शक्य नाही. यासाठी सकारात्मक मनोवृत्ती, सकस आहार, व्यायाम आणि पुरेशी निद्रा या चतुसूत्रीचा अंगीकार सर्वांनी करावा असेही त्यांनी सुचविले.

परिणामकारक लस आली तर ती आपण घेणार का असा थेट सवाल त्यांना केला असता ते उसळून म्हणाले, अजिबात नाही! आपण भारतीयांची व्हायरसला तोंडदेण्याची क्षमता उत्तम आहे, बॅक्टेरियाचा मुकाबला करताना आपण थोडे विक आहोत. आजही लस नसल्याने अनेक विषाणू कार्यरत आहेत मात्र मनुष्याला त्याचा संसर्ग होताच योग्य उपचाराद्वारे बरेही केले जाते. पोलिओ, स्वाईन फ्ल्यू या आजारांवर निघालेल्या लसींचे दुष्परिणाम आपण बघितले आहेत. अनेक विषाणूंची उपद्रवक्षमता कालागणीक कमी कमी होत गेल्याचे देखील आपण बघतो. लस येईपर्यंत कदाचित कोविड-१९ चे देखील असेच होऊ शकते. सर्दी, खोकला, ताप – फ्ल्यू झाल्यावर ४ ते ८ दिवसात रुग्ण पूर्णबरा होऊन पुन्हा नेहमीचे जीवन सूरू करतो तसाच कोविड-१९ चा विषाणू देखील सक्रीय परंतू कमी जोखमीचा राहू शकतो असे मतही ते नोंदवितात.

भीती, दडपण, डब्लूएचओ (WHO) ची दर दोन-चार दिवसांनी बदलणारी आणि गोंधळात भर टाकणारी निवेदने, लसीबाबतची मतमतांतरे आणि तिच्या परिणामकारकते बाबतच्या मर्यादा, कोविड रुग्णांना घरापासून दूर लोटण्याची मानसिकता या साऱ्या नकारात्मक भाव-भावनांच्या वावटळीत जमिनीवर ठाम पाय रोवून अनेक रुग्णांना कोरोनाच्या मगरमिठीतून बाहेर काढणाऱ्या आणि सर्व समाजाला मोठाच मानसिक आधार देणाऱ्या या प्रसिध्दीपरान्मुख धन्वंतरीस सलाम!


निलेश मदाने
[email protected]

लेखक हे विधान मंडळ सचिवलयाचे जनसंपर्क अधिकारी असून त्या अगोदर १२ वर्षे पत्रकारिता, कवी आणि लेखक आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -