घरफिचर्सनदी जगलेला माणूस

नदी जगलेला माणूस

Subscribe

नदीच्या ओटी-पोटी-काठी राहून नदी जगलेल्या बाबांना वाघूर मृत पावली आहे वास्तव पटायचं नाही. दर अमावस्येला भल्या पहाटे ते नागझिरीतलं पाणी आणायला जात. हे पवित्र पाणी अंगावर टाकले की गुरांवरील इळापीडा जाते म्हणून ते हे काम आजवर नित्यनेमाने करत आले होते. आता मात्र गोठा सुना आणि नदीवरून येणारा हंडाही रिकामा असे. हे दृश्य फार जीवघेणं. त्याहून जीवघेणा होता बाबांचा शेवटचा काळ.

आमचे बाबा नदी जगलेला माणूस. रोज संध्याकाळी घरी येताना त्यांची पावलं नदीतून भिजून यायची. अंगात पांढरे डगले कपडे. मळकट सुळक्यात कळण्याची भाकर आणि ठेचा. खांद्यावर गडायकाठी. तरट लावलेली पाण्याची बाटली. डोक्याला गुंडाळलेली छापी. पायात टायरसोल चप्पल हा त्यांचा नित्यचा पेहराव. ते लोकांना सांगायचे श्रीकृष्णाने यमुनेच्या काठी गुरं राखली त्याची परंपरा आम्ही चालवतो आहोत. बाबांचे जन्मनाव माधव होते. हेही कृष्णाचेच नाव. पण माधव हे नाव केवळ त्यांच्या आणि आमच्या शाळेच्या दाखल्यावर तेवढे होते. अख्ख गाव त्यांना ओळखे ‘काळू’ या नावाने. काळू हे कोळीचा अपभ्रंश असावा किंवा त्यांच्या सावळ्या रंगामुळे ते काळू झाले असावेत. अंगकाठी बुटकी पण डोळे तपकिरी पाणीदार होते. नदीसारखे. त्यांची कधीच कुणाला भीती वाटली नाही. गावातले सानथोर त्यांना ओळखायचे. त्याचं कोणाशीही वैर नव्हतं. त्याचं मन नदीसारखंच निर्मळ होतं. त्यांचं अर्धाधिक आयुष्य सालदारकीत गेलं. उरलेलं आयुष्य नदीकाठी. गुरांमागे. त्यांना नदीची भाषा कळायची. नदीची गती, नाद, लय, खोली अशा बारीकसारीक नोंदी त्यांच्याकडे असत.

उगमापासून संगमापर्यंतची वाघूर परिक्रमा त्यांनी केलेली होती. झीरपटपासून मेयाच्या डोहापर्यंत ते गव्हारं घेऊन जात. वाघनये, पाचोटी, भाटी, पाभे या नदीकाठच्या रानात त्यांचा हिवाळा सहज निघायचा. पुराच्या गाळात उगवलेलं कोवळं लुसलुशीत गवत खाऊन ढोरं टम्म फुगायची. यात बाबांना मोठं समाधान मिळे. उन्हाळ्यात कायभुईच्या रानात उलंगती झालेली असायची. मग सारे ढोरकी आपापलं गव्हारं सकाळी नदीवरून पाणी दाखवून तिकडे जायचे. मग उन्हं उतरू लागलीत की एक एक करत पुन्हा नदीवर जमायचे. सातपायर्‍यांजवळ सगळे ढोरकी जमायचे. सुकाबुवा, विठाबुवा, शांताभावजाय आणि बाबा या चौघांचा घरोबा होता. हे चारही ढोरकी दिवाळीला दिवटी काढायचे. त्यांची तयारी नदीवर चालायची. दिवटीसाठी लागणारी सामुग्री एकमेकांना वाटून घेत. दिवटीच्या नागफणा बनवायला लागणारी लव्हाळी आणि सोट नदीतच मिळे. हे काम बाबा मोठ्या आनंदाने करत. म्हशी नदीत शांत बसलेल्या तर पाषाणावर गायी-वासरे रवंथ करत पहूडलेली असायची.

- Advertisement -

भूक लागली की मासे आणि खेकडे पकडून तिथेच भाजून खायचे. या जुन्या दगडी सातपायर्‍यांनी गावातल्या गुराख्यांच्या कितीतरी पिढ्या पाहिल्या. डोंगराची सावली नदीच्या पात्रात पडली की ढोरं घराच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज होत. बाबा जवळच्या आसराच्या झिर्‍याजवळ जात. ओंजळीओंजळीने पोटभर पाणी पीत. नदीतल्या वाहत्या धारेचं पाणी तोंडावर घेत. नदीला नमस्कार करत. ढोरांच्या खुरांनी उठलेले धुळीचे असंख्य लोट नदीचा परिसर झाकून टाकत. दिवेलागणीला ढोर पोहोचून बाबा घरी यायचे.

जेवणं आटोपली की आम्ही भावंडं बाबांना गोष्ट सांगा म्हणून तगादा लावायचो. त्यांच्याकडे गोष्टींनी भरलेला हंडा होता. त्या हंड्यात छोट्या-मोठ्या थैल्यांमध्ये गोष्टी बांधलेल्या होत्या. काही गोष्टी मूठभर तर काही गोष्टी लाम्हणच्या. दोन-दोन दिवस चालायच्या. त्या नदीसारख्या झरझर वाहत राहतच असाव्या असे वाटे. रानातल्या, नदीकाठच्या त्यांच्यासोबत घडलेल्या हकीकती सांगताना बाबा पुन्हा नदीकाठ भटकून यायचे. ‘एका तपस्वी साधूने दिलेला शाप’ ही गोष्ट ते बर्‍याचदा सांगायचे. या गोष्टीतला साधू गावकर्‍यांची पापकर्म पाहून कोपतो. ही गोष्ट सांगून झाली की आम्ही भीतीने झोपून जायचो. बाबाही अस्वस्थ होत.

- Advertisement -

बाबा नास्तिक. ते निसर्गाला देव मानायचे. म्हणून नदीच त्यांच्यासाठी देव. नदीकाठच्या आसरा-जेढारबुवा यांच्यावर त्यांची श्रद्धा होती. या देवतांची-नदीमायची महती गावकर्‍यांना सांगत. कुणाला विंचू-गोम-सापाने चावा घेतला बाबा त्याचं विष मंत्रवून काढत. धामण चावली तर तोंडात लव्हाळी चावत सात वेळा नदी पार केली की विषबाधा होत नाही अशा लोकविद्या त्यांना ठाऊक होत्या. नदीतल्या भोवर्‍यात अडकलेली म्हैस ते एकट्याने काढून आणत. अचानक आलेल्या जीभेत वाहून गेलेल्या अनेकांना त्यांनी वाचवलेत. केवढाही पूर आलेला असला तरी बाबा आपली गुरं पाण्यात ढकलून त्यांची शेपूट धरून नदी पार करायचे. जीवावर बेतणारे कित्त्येक प्रसंग त्यांनी अनुभवले. पण नदीनं त्यांचा कधी घात केला नाही.

नदी आटली आणि हळूहळू गावाला घरघर लागली. चराई संपली. गुरंढोरं दुसर्‍या गावांना पोहोचवली. काहींनी विकली. काहींनी कसायाच्या हवाली दिली. गावकर्‍यांच्या गुराढोरांना लेकरासारखी माया करणार्‍या गुराख्यांना हे चित्र पाहवत नव्हतं. गुडघेदुखीने बेजार झाल्यामुळे बाबांनी गव्हारं सोडून दिलं. घरच्या गायींचे खुंटेही ओस पडलेले. तरी ते घरी निवांत बसायचे नाही. हातात विळा-काठी घेऊन ते नदीच्या वाटेनं निघत. कुठे मासे मिळतात का पाहत. पाणथळ जागी वकीर पाहून खेकडे पकडण्याचा विफल प्रयत्न करायचे. संध्याकाळी गवताच्या पेंढ्या घेऊन ते घरी परतायचे. इतकी वर्षे गुरा-ढोरांशी लळा लागलेल्या बाबांना आता आपल्याकडे एकही ढोर शिल्लक नाही याचा त्यांना विसर पडायचा. नदीच्या ओटी-पोटी-काठी राहून नदी जगलेल्या बाबांना वाघूर मृत पावली आहे वास्तव पटायचं नाही. दर अमावस्येला भल्या पहाटे ते नागझिरीतलं पाणी आणायला जात. हे पवित्र पाणी अंगावर टाकले की गुरांवरील इळापीडा जाते म्हणून ते हे काम आजवर नित्यनेमाने करत आले होते. आता मात्र गोठा सुना आणि नदीवरून येणारा हंडाही रिकामा असे. हे दृश्य फार जीवघेणं. त्याहून जीवघेणा होता बाबांचा शेवटचा काळ.

त्यांच्या मेंदूचं नियंत्रण सुटलं होतं. उण्या रक्तदाबामुळे कोणत्याही औषधांचा त्यांच्यावर असर होईना. खाटेवर पडून असत. सूद हरपलेली अवस्था. बायको, लेकरं, नातवंडांनाही ते ओळखत नव्हते. कधी गुरांना हाकलतानाचा आवाज काढत. असंबंध बोलत. कधी रानातल्या, नदीच्या गोष्टी सांगत. कधी आपल्या सोबत्यांशी गप्पा करत. नदीचा पूर त्यांच्या चेहर्‍यावर ओसांळून वहायचा. पुराबद्दल कीतीतरी गोष्टी ते बोलून जात. मोठ्याने हसत. रडत. पुरात पार अडकलेल्या माणसांना मोठ्याने आवाज द्यायचे. आम्ही भावंडं पुन्हा लहान झालो होतो. पुन्हा बाबांच्या भोवती गराडा घालून त्याच गोष्टी ऐकत होतो. कुठलाही तगादा न लावता. बाबांनी श्वास सोडला तेव्हा त्यांच्याजवळ कुणीही नव्हतं.

ते शेवटचं ते काय बोलले हे माहीत नाही. नक्कीच ते वाघूरविषयी बोलले असतील. ‘नदिमाय गावाला, गायी-गुरांना खुशाल राहू दे’ असं ते म्हटले असतील. त्यांचं बोट धरून नदीवर जायचो त्याचं वाटेनं बाबांना खांद्यावरून नेताना कितीतरी आठवणी जाग्या झाल्या. ज्या सातपायर्‍यांच्या पायथ्याशी उभं आयुष्य गेलं तिथं त्यांना विसावा देण्यात आला. नदीचं वैभव पाहिलेल्या बाबांना शेवटचं पाणी द्यायलाही नदीत थेंब नव्हता. जिथं वाहत्या धारेत ढोरकी दिवट्या विसर्जित करत त्याच जागी त्यांना अग्निडाग दिला. त्यांच्या अस्थींचे विसर्जन करायला कोणत्याच डोहात पाणी नव्हतं. त्यावेळी बाबांनी सांगितलेल्या ‘साधूच्या शापाची’ गोष्ट आठवली. आज खरी ठरली होती.

-नामदेव कोळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -