घरफिचर्सश्रेष्ठ लेखिका दुर्गा भागवत

श्रेष्ठ लेखिका दुर्गा भागवत

Subscribe

दुर्गा भागवत या श्रेष्ठ मराठी लेखिका. लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक; समाजशास्त्र, मानववंशशास्त्र व बौद्धधर्म यांच्या अभ्यासक आणि लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या झुंजार पुरस्कर्त्या. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1910 रोजी इंदूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे येथे झाले. १९२७ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. (संस्कृत व इंग्रजी) झाल्या. १९२९ साली शिक्षण स्थगित करून म. गांधीजींच्या राष्ट्रीय चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९३५ मध्ये त्या एम.ए. झाल्या. त्यासाठी ‘इंडियन कल्चरल हिस्टरी’ शाखेत ‘अर्ली बुद्धीस्ट ज्युरिसप्रूडन्स’ या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएच डी. च्या प्रबंधासाठी ‘सिंथिसीस ऑफ हिंदू अ‍ॅण्ड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया’ या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले. म. गांधी, टॉलस्टॉय, हेनरी डेव्हिड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ.केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रमुख प्रेरणास्थाने होती.

सुस्पष्ट प्रामाणिक विचार, छोटी छोटी वाक्ये, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ठ्य होते. दुर्गाबाईंच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ अभ्यासपूर्वक नोंदविलेले दिसतात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे आस्थेचे विषय होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते आणि ‘आपणाला जे जे ठावे ते इतरांना सांगावे’ हा समर्थ रामदासांचा विचार प्रत्यक्षात आणण्याची तळमळ दुर्गाबाईंमध्ये दिसून येते. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेत हा ठामपणा दिसून येतो. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडालेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलीभाषेची मांडणी आढळते. तसेच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेले त्यांचे विचारही त्यांच्या साहित्यात दिसून येतात. दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता, अस्सल भारतीयत्व, सनातनत्व यांचा वेध घेण्याची शक्ती यामुळे ललित निबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे.

- Advertisement -

पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दोन वर्षे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. कराड येथे १९७५ साली झालेल्या ५१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेअध्यक्षपद त्यांनी भूषवले.

‘पैस’, ‘ॠतुचक्र’, ‘डूब’ अशा ललित लेखांच्या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. बाणभट्टाची ‘कादंबरी’,‘जातककथा’, यांचा अनुवाद करणार्‍या दुर्गाबाईंनी थोरो या अमेरिकन विचारवंताच्या पुस्तकाचा ‘वॉल्डनकाठी विचारविहार’ नावाचा अनुवादही केला. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’ चा संस्कृतात अनुवाद करण्याचे कौतुकास्पद कार्य दुर्गाबाईंनी केले. त्यांनी भाषांतरित केलेली आणि सरिता प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेली ‘लोककथामाला’ मराठीतील लोककथा आणि बालकथा यांमधला महत्त्वाचा ठेवा आहे. अशा या श्रेष्ठ लेखिकेचे 7 मे 2002 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -