तोंडाला येणारी दुर्गंधी ही तक्रार अनेकांना भेडसावत असते. बऱ्याचदा तोंडाला वास येऊ नये म्हणून वेलची, बडिशेप, सुगंधी सुपारी याचे सेवन केले जाते. मात्र, काहींच्या तोंडाला ही सतत दुर्गंधी येत असते आणि यामुळे व्यक्तीगत आरोग्यासह दैनंदिन जगण्यातही अनेक अडथळे निर्माण होतात. चला तर जाणून घेऊया ही दुर्गंधी दूर होण्याचे उपाय.
पाणी
तोंडाची दुर्गंधी दूर ठेवण्यासाठी पाण्यासारखा दुसरा कोणता उपाय नाही. हा उपाय आमलात आणायला अगदी सोपा आहे. कोणताही पदार्थ खाल्यानंतर खळखळून चूळ भरावी. यामुळे दातात अडलेले काही कण निघून जातात आणि तोंड स्वच्छ होते. त्यामुळे पाण्याने चूळ भरुन सातत्याने पाण्याचे सेवन करावे. यामुळे तोंडातील जीवाणू नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळे सातत्याने पाण्याचे सेवन करावे.
संत्री, लिंबूचे सेवन
संत्री, लिंबू अशा आंबट फळांमध्ये अँटिऑक्सिडंटही असते. तसेच या फळांमध्ये असलेले ‘क’ जीवनसत्व जीवाणूंना नष्ट करते. त्यामुळे शरीरातील विषारी घटक कमी होण्यास त्याची मदत होते. ही फळे तुम्ही खाऊ शकता किंवा त्याचा रस घेऊ शकता. यामुळे त्याचा चांगला फायदा होतो.
मसाले आणि हर्ब्स
वेलची, बडिशेप, दालचिनी, लवंग वगैरेसारखे मसाले आणि पुदिना, कोथिंबीर, पार्सले, निलगिर यांसारख्या वनस्पती श्वास ताजातवाना ठेवण्यासाठी उपयुक्त असतात. निलगिरी आणि वेलचीत सिनेऑल नावाचा घटक असतो. यात प्रतिजैविक आणि संसर्गरोधक घटक असतात. सिनेऑल तोंडातील दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा नाश करते आणि आपल्याला तोंड स्वच्छ आणि फ्रेश झाल्यासारखे वाटते.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये फ्लॅवोनाईड्सचे प्रमाण भरपूर असते. यामुळे दातांचे आरोग्य चांगले राहते. दालचिनी घातलेला चहा आपले तोंड आणि श्वास ताजा ठेवतो.
दही
दह्यासारखे पदार्थ तोंडातील हायड्रोजन सल्फाईडला नष्ट करतात. दात आणि हिरड्यांच्या समस्या दूर होण्यास त्यामुळे मदत होते.