मुंबई शहरातल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातला हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. मराठी बहुभाषिकत्व आणि कोळी व्यवसाय करणाऱ्यांचं प्राबल्य ही या मतदारसंघाची मुख्य ओळख म्हणता येईल. जिथे बाजूचे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसोबत जात असताना या मतदारसंघानं मात्र, कुणा एका पक्षाशी बांधील न राहाता वेगवेगळ्या पक्षांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते सचिन अहिर यांनी १९९९ आणि २००४ या दोन टर्म सलग इथून विधानसभा जिंकली होती. त्यानंतर २००९मध्ये मनसे आणि सध्या शिवसेनेच्या आमदारावर इथल्या मतदारांनी भरवसा दाखवला आहे. या मतदारसंघात एकूण २४९ मतदान केंद्र आहेत.
मतदारसंघ क्रमांक – १८३
मतदारसंघ आरक्षण – खुला
मतदारांची संख्या
पुरुष – १,५१,४५६
महिला – १,२२,०३९
एकूण मतदार – २,७३,४९५
विद्यमान आमदार – अजय चौधरी, शिवसेना
कट्टर शिवसैनिक असलेल्या अजय चौधरी यांना शिवसेनेच्या शाखा आणि विभाग स्तरावर काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. १९७२ सालापासून शिवसेनेच्या पक्षांतर्गत रचनेमध्ये ते कार्यरत होते. २०१४मध्ये पहिल्यांदाच ते विधानसभेवर निवडून गेले. मनसेचे विद्यमान आमदार बाळा नांदगावकरांचा मराठी फॅक्टर असूनदेखील त्यांनी ३१ हजार इतक्या मोठ्या मताधिक्यानं पराभव केला. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती.
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) अजय चौधरी, शिवसेना – ७२,४६२
२) बाळा नांदगावकर, मनसे – ३०,५५३
३) शलाका साळवी, भाजप – २१,९२१
४) मनोज जामसुतकर, काँग्रेस – १२,७३२
५) नंदकुमार काटकर, राष्ट्रवादी – ५२६९
नोटा – १८१६
मतदानाची टक्केवारी – ५३.७८ %