मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार पीयूष गोयल यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘गरीबी हटाओ’ नव्हे तर, ‘गरीब को हटाओ’ हा सध्याच्या राजवटीचा हेतू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – INDIA : विरोधकांच्या आघाडीची रविवारी दिल्लीत रॅली; केजरीवाल, सोरेन कारवाईचे मुद्दे केंद्रस्थानी
भारत सरकारला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला झोपडपट्टीमुक्त करायचे आहे कोणालाही झोपडपट्टीत राहणे आवडत नाही, ही सक्तीचे जीणे आहे. म्हणून त्यांना झोपडपट्टीतून कसे बाहेर काढायचे, त्यांना सन्मानाचे आणि स्वाभिमानाचे जीवन कसे द्यायचे हे आपल्यावर अवलंबून आहे, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. मीठ तयार करण्यासाठी वापर केला जात नाही, अशा मिठागराच्या जमिनचा वापर सार्वजनिक गृहनिर्माण किंवा पुनर्वसनासाठी केला जाऊ शकतो. भारतात सुमारे 60,000 एकर जमीन सॉल्ट पॅन लँड पार्सल म्हणून वर्गीकृत आहे आणि यापैकी काही मीठ उत्पादनासाठी वापरली जात नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
A candidate from Mumbai North, Shri Piyush Goyal ji, of the bjp, said in an interview to a prominent newspaper that slums must go, and that they’ll probably be shifted out to all salt pan lands.
Goyal ji, the bjp has had a full majority (authoritarian) govt at the centre for 10…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 30, 2024
हाच संदर्भ देत राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. मुंबईतील झोपडपट्ट्या हटवल्या गेल्या पाहिजेत आणि त्या मिठागराच्या जमिनींवर हलवल्या पाहिजेत, असे केंद्रीय मंत्री गोयल यांनी म्हटले आहे. पण भाजपाचे केंद्रात 10 वर्षे पूर्ण बहुमत (हुकूमशाही) असलेले सरकार आहे आणि 8.5 वर्षे (2.5 वर्षे घटनाबाह्य सरकार धरून) महाराष्ट्रात सत्ता आहे. त्यामुळ गोयल यांनी आपल्या मुलाखतीत नमूद केलेल्या गोष्टींचा विकास करण्याच्या भरपूर संधी भाजपाला मिळाल्या होत्या. परंतु केंद्र सरकारकडून मुंबईकरांना काय मिळाले? मुंबईकरांची फसवणूक, आर्थिक लूट आणि अभिमानाला ठेच हेच मिळाले.
हेही वाचा – Devendra Fadnavis : महायुतीत अजूनही 4-5 जागांचा तिढा, फडणवीसांनीच केले मान्य
उत्तर मुंबईची जागा लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असला तरी, याचा अर्थ असा नाही की हुकूमशाही राजवट लागू करत आमच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांना बळजबरीने मिठागराच्या जमिनीवर स्थानांतरित कराल. त्यांना शाश्वत विकास हवा आहे आणि त्याला आम्हा समस्त मुंबईकरांचा पाठिंबा आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रत्येक व्यक्तीला 2022पर्यंत स्वत:चे घर असेल, या आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नाही, असे सुनावतानाच, बिल्डरांना फायदा व्हावा यासाठी भाजपाचा मुंबईतील मिठागरांवर डोळा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. मिठागराची जागा असल्याचा खोटा दावा करत केंद्र सरकारने 3, 4, 6 आणि 14 मार्गिकेसाठी मेट्रो कार डेपोचा कांजूरमार्ग जमिनीचा प्रस्ताव का रोखला? फक्त मुंबईकरांना फायदा होईल म्हणून? असा प्रश्नही त्यांना केला आहे.
बिल्डर लॉबीपासून आम्ही आमच्या मिठागराच्या जमिनींचे संरक्षण करू. आम्ही शहराचा सर्वांगिण विकास साधत झोपडपट्टीत राहणाऱ्यांना त्यांना पक्की घरे देऊ. महाराष्ट्रविरोधी हितसंबंध जपू पाहणाऱ्यांपासून आम्ही आमच्या महाराष्ट्राचे रक्षण करू. सध्याच्या राजवटीचा हेतू केवळ गरीबी हटाओ नसून गरीब को हटाओ आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
हेही वाचा – Electoral Bond : मतदानापर्यंत ही गोष्ट कुणीही विसरू नये, अन्यथा…, रोहित पवारांनी मतदारांना केले अलर्ट