मुंबई : महायुतीत कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार, याबाबतची कोणतीही माहिती अद्यापही समोर आलेली नाही. परंतु, याबाबत आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुतीत अद्यापही चार ते पाच जागांचा तिढा कायम असल्याची माहिती आज (ता. 30 मार्च) उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांकडून ही माहिती देण्यात आली आहे. (Devendra Fadnavis admitted that there is still a rift of 4-5 seats in Mahayuti)
हेही वाचा… Ambadas Danve : खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर दानवे संतापले, म्हणाले – मानहानीचा दावा करणार
डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देत जागावाटपाबाबतही माहिती दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आमचे चार ते पाच जागांवर अडलेले आहे. एक जागा अडली तर तीन जागा अडल्या जातात. फार अडले असे नाही. थोडे अडले आहे. तो तिढा आज उद्या सुटेल. तसेच, धाराशीवच्या जागेबाबत महायुतीच्या स्थानिक नेत्यांनाच निर्णय घेण्यास सांगितले असल्याची माहिती फडणवीसांकडून देण्यात आली आहे.
आम्ही ऑपरेशन केले ना तर तुम्हाला कळत नाही. तुम्हाला कळले तर ते ऑपरेशन नाही. आम्ही जो भूकंप करणार आहोत असे तुम्ही सांगत आहात, तो कोणता भूकंप आहे ते तरी आम्हाला सांगा. असा काही भूकंप होणार हे आम्हालाच माहीत नाही. तुमच्याकडूनच ऐकत आहोत. तुम्ही मराठवाड्यातील त्या नेत्याचे नाव सांगा. आम्ही त्याचा पिच्छा करू, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तर, अंबादास दानवेशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांच्या प्रवेशाची चर्चा नाही. का अंबादास दानवेंना त्रास देत आहात? असा प्रश्नही यावेळी फडणवीस यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.