कल्याण । ग्लॅन्मार्क या प्रतीत यश औषध कंपनीची हृदय रोगावर उपयुक्त असे टेलमा हे औषध बनावट आढळल्याने पोलिसांनी लाखो रुपयांचा साठा घाऊक विक्रेत्यांकडून जप्त केला आहे. दोन घाऊक विक्रेते तर एका रिटेलरवर एफडीएने खरेदी विक्री बंदची कारवाई केली आहे. डिस्काउंटच्या प्रलोभनात जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याचे यावरून स्पष्ट होते. महाराष्ट्र बाहेरून येणाऱ्या औषधांवर नियंत्रण असावे अशी मागणी आता औषध विक्रेते करीत आहेत.
ग्लॅनमार्क कंपनीने नेत्रिंका कन्सल्टन्सी इंडिया या एजन्सीला बनावट औषधे शोधण्याची जबाबदारी दिली होती. कंपनीचे फील्ड ऑफिसर राकेश सावंत यांनी कल्याण येथील दुकानांमधून ब्लड प्रेशरवर उपयुक्त टेलमा हे औषध खरेदी करून लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले होते. लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर हे औषध हे डुप्लिकेट आणि ट्रेडमार्क मध्ये छेडछाड करून बनवण्यात आल्याचे आढळून आले त्यावरून त्यांनी कल्याण येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कल्याण येथील रॉयल मेडिकल दुकानावर तसेच दृष्टी एंटरप्राइजेस आणि हिलकोर हेल्थ केअर या घाऊक विक्रेत्यांकडून टेलमा हे औषधांचा लाखो रुपयांचा सर्व साठा जप्त केला.
अन्न आणि औषध प्रशासनाने या तीनही दुकानावर स्टॉप सेलच्या नोटीसा देऊन दुकानातून प्राप्त औषध तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे. टेलमा हे औषध उच्च रक्तदाब हृदय रोगावर परिणामकारक असे औषध आहे. कल्याण मधील लाल चौकी येथील रॉयल मेडिकल कंपनीने नोव्हेंबर मध्ये सॅम्पल घेतल्यानंतर त्याचा अहवाल जानेवारी महिन्यात प्राप्त झाला होता. त्यानुसार हे औषध ट्रेंड मार्क , एमआरपी आणि नाव यामध्ये फेरफार करून बाहेरून उत्पादन केल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आलेले आहेत. त्यानुसार दोन घाऊक विक्रेते आणि एक किरकोळ विक्रेता यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे.
डिस्काउंटच्या प्रलोभनाने पूर्ण आरोग्य व्यवस्था धोक्यात आले आहे हे या सर्व घटनेवरून प्रामुख्याने लक्षात येते. घाऊक विक्रेते यांनी औषधी खरेदी करताना आपल्या राज्यातूनच करावी अधिकृत एजन्सी कडून करावी, असे आवाहन अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी यानिमित्ताने केले. किरकोळ औषध विक्रेत्याने देखील औषध खरेदी करताना दक्षता बाळगावी असेही त्यांनी सांगितले. ऑनलाइनच्या माध्यमातून देखील अशीच मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट औषध येत असल्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यावर गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्र बाहेरून औषध येणार नाही किंवा आल्यास त्याची तपासण्याची एक वेगळी स्वतंत्र व्यवस्था लावावी असे आवाहन संघटनेच्या वतीने त्यांनी केले आहे. पुढील तपास कल्याण बाजारपेठ पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नवनाथ रूपवते हे करीत आहेत.