नाशिक – अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येतेय. मात्र, या गद्दारांनी खोके केवळ स्वतःसाठी ठेवलेत, मदतीला दिले नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पीडित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आम्ही शेतकऱ्यांसोबतच आहोत, प्रशासनाला तातडीने मदत करायला लावू असं आश्वासन आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले. कोणीही धीर सोडू नका, उद्धव साहेबांनी फक्त तुमच्यासाठी आम्हाला येथे पाठवलं आहे. गद्दारांनी खोके त्यांच्याजवळ ठेवले, पण मदतीला दिले नाहीत. पण आम्हाला राजकारण करायचं नाही. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि याबाबतचा आवाज आम्ही विधानसभेत उठवू,” असा शब्द आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
आत्ताच धामणगाव, इगतपूरी, जिल्हा नाशिक इथे पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. सांगितलं की, यापूर्वीही अशी अनेक संकटे आली होती, पण त्याचा तुम्ही सामना केलात. आत्ताही तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत! pic.twitter.com/28Rit6TzfS
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 27, 2022
आदित्य ठाकरेंनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनीही त्यांच्या समस्या आदित्य ठाकरेंकडे मांडल्या. आम्हाला मदत सोडा, मुख्यमंत्री भेटायलाही आले नाहीत, असं शेतकरी म्हणाले. त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याचे आवाहन आदित्य ठाकरेंनी सरकारकडे केले आहे.
हक्काची जमीन महामार्गाला दिल्यावर शेतकऱ्यांची मात्र कुचंबणा होताना दिसत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट एकत्र बळीराजावर कोसळतंय,खोके सरकार मात्र थंड आहे. pic.twitter.com/Qvb771DvUP
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 27, 2022