मुळा आणि भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय औरंगाबाद पाटबंधारे महामंडळाने घेतला होता. परंतू, प्रवरा आणि उर्ध्व धरणामधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याचा निर्णयाविरुद्ध डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी व संजीवनी सह. साखर कारखान्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ३१ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे औरंगाबाद पाटबंधारे महामंडळाने मुळा आणि भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला तात्पूर्ती स्थगिती दिली आहे.
अनुचित प्रकार घडू नये
जायकवाडीला पाणी सोडण्याची पूर्ण तयारी झाली होती. सोमवारी दुपारी १२ वाजता मुळा आणि भंडारदरा या धरणातून पाणी सुटणार होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सोमवारी पूर्वतयारीच्या कामांचा आढावा घेतला होता. या आढावा संबंधित घेण्यात आलेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्माही हजर होते. या बैठकीत अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याचीही चर्चा झाली. त्यामुळे धुळे आणि नंदूरबार येथून राज्य राखीव पोलीस दलाची कुमक बोलवण्यात आली. हे पथक नगरकडे रवाना झाले होते. त्याचबरोबर पाटबंधारे विभागाचे अधिकारीही मुळा व निळवंडे धरणाजवळ दाखल झाले होते. परंतु, अडीच वाजता औरंगाबाद पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिकर यांनी पाणी न सोडण्याचे आदेश पाठवले. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आणि न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमुळे हा निर्णय घेण्यात आला. ३१ ऑक्टोबरला यावर सुनावणी होणार आहे.
हेही वाचा – मराठवाड्याला आता मिळणार ‘हक्काचे पाणी’